मसूर : जागतिकीकरणामध्ये टिकून राहण्यासाठी शेतकर्यांच्या मुलांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी कारखाना कार्यस्थळावर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी पाहिले होते, त्यासाठी संचालक मंडळाच्यासहकार्याने कारखाना कार्यस्थळावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी संलग्न कारखाना संचलित सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले असून, या महाविद्यालयातून नवनवीन शास्त्रज्ञ घडावेत अशी अपेक्षा महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसम्मेलन आणि पारितोषिक वितरण सभारंभाप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. बाळासाहेब पाटील बोलत होते.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मानसिंगराव जगदाळे, सुरेशराव माने, डी.बी.जाधव, महादेव वाघमारे, संजय जगदाळे, संजय कुंभार, भास्करराव गोरे, तानाजीराव जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
आ. बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, या महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात गुणवत्ता मिळवत आहेत. शेतकर्यांच्या घरात कृषि तंत्रज्ञ तयार होत आहेत, याचा नक्कीच ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी आणि युवकांना मोठा फायदा होईल. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शेतीच्या ज्ञानाची दारे महाविद्यालयामार्फत शेतकर्यांसाठी खुली होत आहेत याचा आनंद होत असून, महाविद्यालयासाठी सर्व सोयींनीयुक्त मुख्य इमारत, मुला-मुलींकरीता स्वतंत्र वसतीगृहे, प्राध्यापकांकरीता सदनिका बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, महाविद्यालयाचे कामकाज येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत होणार असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्राचार्य डॉ. शिवाजी बच्चे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला, शेतकर्यांच्या मुलांना आधुनिक शेतीचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी कार्यस्थळावर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांचे स्वप्न कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यंानी पूर्ण केले, या महाविद्यालयासाठी सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज अशी इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीनीं सुसज्ज नवीन कॅम्पस उपलब्ध करुन दिल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील आणि संचालक मंडळास धन्यवाद दिले.
यावेळी कृषि यशवंत-2018 या महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी रोहीत धर्मे याने मनोगत व्यक्त केले.सांस्कृतिक कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी विनोद, गायन, नृत्य सादर केले.कार्यक्रमास यशवंतनगरचे सरपंच तुळसीदास चव्हाण, कारखान्याचे फायनान्सिअल अॅडव्हायझर एच.टी.देसाई, सिव्हील इंजिनिअर वाय.जे.खंडागळे, कामगार व कल्याण अधिकारी एन.आर.जाधव, शेती अधिकारी एम.ए.पाटील, जनसंपर्क अधिकारी व्ही.जे.शेलार, वाहन विभाग प्रमुख व्ही.बी.क्षीरसागर, महाविद्यालयाचे ऑफिस सुपरिटेंडंट व्ही.एम.पोळ, डिस्टीलरी इनचार्ज डि.जे.जाधव, पी.एस.सोनवणे, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, एस.जी.चव्हाण, पी.एस.चव्हाण, संभाजी चव्हाण, विकास चव्हाण यांचेसह सर्व विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आदि उपस्थित होते.
सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातून नवनवीन शास्त्रज्ञ घडावेत : आ. बाळासाहेब पाटील
RELATED ARTICLES