कातरखटावः विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा बरोबरच व्यवहारीक ज्ञान अवगत होण्यासाठी अभिरुप बाजाराचा फायदा होईल असे मत समीर तांबोळी यांनी व्यक्त केले.
बनपूरी ( ता. खटाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणावर आयोजित केलेल्या अभिरुप बाजाराचे उदघाटन करताना ते बोलत होते. यावेळी सरपंच रामभाऊ देवकर – पाटील, माजी सरपंच आबासाहेब देवकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप पाटोळे, विनोद जगदाळे, धनंजय चिंचकर, मुख्याध्यापक सुनिल महामुनी, रावसाहेब हांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तांबोळी म्हणाले की लहान मुलांमध्ये जिज्ञासा व चिकाटी हे दोन चांगले गुण असतात. बाजारासारख्या उपक्रमामुळे त्यांच्या या कलागुणांमध्ये वाढ होण्यास चांगली मदत होणार आहे. शाळेच्या वतीने चिमुकल्यांसाठी राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम कौतुकास्पद आहेत. या उपक्रमास पालकांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही समाधानाची बाब आहे. बनपूरी प्राथमिक शाळेमुळे मुलांची चांगली मजबूत पायाभरणी होत आहे.
यावेळी मान्यवरांनी बाजारातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या दुकानासमोर जावून माहिती घेण्याबरोबर चिमुकल्यांचे कौतुक केले. याचवेळी कातरखटाव येथिल जिल्हापरिषद शाळेतही चिमुकल्यांनी अभिरुप बाजार ठरविला होता. कातरखटावचे सरपंच तानाजी बागल यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. लहान मुलांनी सकाळी सकाळी गोळा केलेल्या ताज्या भाज्या, फळे तसेच इतर खाद्यपदार्थांची दोन तासात हातोहात विक्री झाली. बाजार यशस्वीतेसाठी उपशिक्षक दत्तात्रय पानस्कर, रफीक मुलाणी, आप्पासाहेब शिंगाडे, तेजस्वी पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्राम पंचायत सदस्या शारदा देवकर, बापूराव देवकर, जालींदर देवकर, कैलास देवकर, सुभाष देवकर, शांताराम देवकर, यशवंत देवकर, वैशाली पाटोळे, राजश्री जाधव आदीसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बनपुरी, कातरखटाव येथे चिमुकल्यांचा अभिरुप बाजार
RELATED ARTICLES