औंध /प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून मास्क न वापरतात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या औंध- पुसेसावळी परीसरातील ५२ जणावर औंध पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून १२ हजार तीनशे ऐंशी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांच्या मध्ये जागृती करण्यात येत आहे. तरीदेखील काही लोक आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. अशा लोकांना पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी आदेश दिला होता की जे लोक तोंडाला मास्क न लावता बाहेर फिरतील त्यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.त्यानुसार औंध पुसेसावळी परीसरात या आदेशाचे उल्लंघन करून मास्क न लावता फिरणाऱ्या ५२ लोकावर औंध पोलीस स्टेशनच्या वतीने कारवाई करून त्यांच्याकडून १२३८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस हावलदार कुंडलिक कटरे यांनी सपोनि उत्तमराव भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
सर्वांनी सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे.
कोरोनाचा बिमोड करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले तर आपण निश्चित कोरोनावर मात करू. सुचनांचे पालन केल्यास पोलिसांना कारवाई करण्याची गरज पडणार नाही. :- उत्तमराव भापकर ,सपोनि औंध पोलीस स्टेशन.