सातारा (एकनाथ थोरात) : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 3 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सातारा जिल्ह्यातील 257 गावांची सातारा जिल्हा परिषदेने निवड केली आहे. या मध्ये ग्रामपंचायत खिंडवाडी या गावांचा समावेश झाला असून आज ग्रामस्थ, युवक, शालेय विद्यार्थी घनकचरा ओला व सुका एकत्र करून स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
प्लॅस्टिक बाटल्या, कॅरी बॅग, तसेच ओला व सुका कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रदुषण मुक्त गावांची ओळख निर्माण होण्यासाठी घरकचरा व्यवस्थापनाला खिंडवाडी मध्ये श्री गणेशा करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत व घनकचरा गोळा करण्याच्या मोहिमेत सरपंच संजय चोरगे, उपसरपंच शितल साने, ग्रा.पं.सदस्य अमर पवार, नितीन काळे, उमेश मोहिते, सीमा कुजळकर, शारदा जाधव, रजनी साखरे, लता जाधव, ग्रा.पं. कर्मचारी मिना कदम, ग्रामसेवक ए.पी.ठोंबरे, सातारा जि.प.प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक श्री.लोहार, विद्यार्थी, वेदांत करीअर अॅकॅडमीचे विद्यार्थी, विविध मंडळाचे तरूण यांनी आज खिंडवाडीमधील अंतर्गत रस्ता तसेच महामार्गापर्यंत प्लॅस्टिक कचरा गोळा केला. तसेच ओल्या व सुक्या कचर्यांचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली.
घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खिंडवाडी येथे स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला असून स्वच्छता मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.