सातारा : जिल्हा प्रशासने व जिल्हा परिषदेने अनेक प्रकरणे आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवली आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत असून या राष्ट्रीय लोकअदालतीमुळे नागरिकांना जलदगतीने न्याय मिळत आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज व्यक्त केला.
आज येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील प्रत्येक पॅनलला जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी आज भेट दिली, यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा, जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव वर्षा पारगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असे राष्ट्रीय लोकअदालतीयचे आयोजन करण्यात आले आहे. अशा लोकदालतीमुळे लोकांचा पैसा तसेच वेळ वाचत आहे. याचा नक्कीच सातारा जिल्हा वासीयांना फायदा होईल. एका जोडप्याने घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पण राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून दोघांमध्ये सुसंवाद घडला. आता हे जोडपे गुण्यागोविंदाने संसार करणार आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहनही त्यांनी यांनी शेवटी केले.