सातारा दि : (अजित जगताप) उन्हाळा आला की दरवर्षी पाणी टंचाईचे संकट उभे राहते.त्यावर मात करण्यासाठी अनेकजण बोअरवेल मारून घेतात.पण,यंदा कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सातारा जिल्ह्यात बोअरवेल व्यवसायिकांना तब्बल साडेतीन कोटी रुपये आर्थिक फटका बसला आहे.
याबाबत माहिती अशी की,उन्हाळ्यात पाण्याची पातळी बाष्पीकरण होत असल्याने कमी होत असते. नदी-नाले,विहिरी,धरणे,पाझर तलाव व बोअरवेलचे पाणी सुध्दा कमी होते.अशा वेळी पाण्याची गरज भागविण्यासाठी काही जण स्वखर्चाने बोअरवेल मारतात. सर्वानाच मुबलक पाणी बोअरवेलला लागते असे नाही.तरीही गरज म्हणून ते काम केले जाते.स्थानिक पाणाडी किंवा नारळ फिरवून व यंत्राच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी शोधण्याचा प्रयत्न केला जातो.त्यानंतर बोअरवेलच्या साहाय्याने खोदाई सुरू होते.
जानेवारी महिन्यापासून दरवर्षी सातारा जिल्ह्यात तामिळनाडू,तेलंगणा,कर्नाटक राज्यातून सातारा,कराड,फलटण,माण,खटाव,कोरेगाव,जावळी,खंडाळा,महाबळेश्वर,वाई तालुक्यातील शहरे व ग्रामीण भागात २५ ते ३० बोअरवेलच्या गाड्या दाखल होतात.एका गाडी सोबत दोन वाहक,दोन डिलर,आठ ते दहा मजूर असतात.ते जेवणाचे साहित्य सोबत घेऊनच ज्या ठिकाणी बोअरवेल मारली जाते.तिथे भात,आमटी बनवून जेवण बनवितात.
वाढत्या महागाईने सध्या साठ ते पासष्ट रुपये फूट खोदाई केली जाते.तीनशे ते साडेतीनशे केसिंग,पाचशे रुपये वॉशिंग असे एका बोअरवेलला चाळीस ते साठ हजार खर्च होतो.काही स्थानिक लोक मध्यस्थी बनून ऑर्डर घेतात. दरवर्षी शेती व नागरी वस्ती वाढत असल्याने बोअरवेल मारण्याचे प्रमाण अधिक आहे.यंदाच्या वर्षी हा व्यवसाय ‘ड्राय’गेला आहे. साडे तीनशे माणसांना कामधंदा नसताना बोअरवेल मालक,चालक व कंपन्यांना ही माणसं सांभाळावी लागत आहे.लॉकडाउन मुळे त्यांना माघारी घेऊन जाता येत नाही. सुमारे साडेतीन कोटी रुपये मिळेनासे झाले आहेत.त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या व्यवसायात मध्यस्थी म्हणुन सातारा जिल्ह्यातील अडीचशे स्थानिक लोक काम करतात.काहींनी ऑर्डर घेतली पण,बोअरवेल मारता येत नाही.दुसरीकडे लोक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत.तोडगा निघेपर्यंत पावसाळा येण्याची चिन्ह आहेत अशी माहिती सातारा तालुक्यातील किडगाव येथील सुधाकर काकडे यांनी दिली आहे.परप्रांतीयां कामगार सातारा जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात येतात.यंदा त्यांना घरची ओढ लागली आहे.कोरोना पासून सुरक्षित असूनही काळजी वाटत आहे.हा ड्राय सिजन सर्वांना कायमचा लक्षात राहणार आहे हे मात्र खरे आहे.
सातारा जिल्ह्यात बोअरवेल व्यवसायिकांना साडेतीन कोटींचा फटका
RELATED ARTICLES