सातारा नगरपालिकेचा आरोग्य विभाग कोमात?
सातारा : गेले दोन दिवस सातारा येथील बुधवार पेठेत असणारी कचराकुंडी कचर्याने ओव्हरफ्लो होऊन सुद्धा सातारा नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन दिवस होऊनही कचराकुंडीतील कचरा उचलला नसल्याने नगरपालिकेचा आरोग्य विभाग कोमात गेला की काय? अशी विचारणा येथील नागरिकांमधून होत आहे.
सातारा शहरात कचरा कुंड्या ही अत्यंत गहन समस्या निर्माण झाली आहे. कचरा उचलण्यासाठी सातारा नगरपालिकेने दोन कंपन्यांना टेंडर दिले आहे. संबंधित कंपनीने कचरा उचलणार्या घंटा गाड्यांना जीपीएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. एका घंटागाडीने दिवसभरात 8 फेर्या करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. सातार्यातील लोणार गल्ली, सदर बाझार येथील कर्मवीर कॉलनी, बुधवार पेठेतील काही परिसर याठिकाणी कचराकुंडीतील कचरा उचलण्यासाठी नेहमी टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मध्यंतरीच्या काळात साशा या कंपनीकडून शहरातील कचरा उचलण्याबाबत दिरंगाई केली जात होती. नगरपालिकेने या कंपनीला कचरा उचलण्याबाबत सक्त सूचना दिल्या असतानाही आज परिस्थितीमध्ये फारसा फरक पडला असल्याचे दिसत नाही.
सातारा येथील बुधवार पेठेत असणारी एक कचराकुंडी गेल्या दोन दिवसांपासून कचर्याने ओवरफ्लो झाली आहे. वार्याने प्लास्टिकच्या पिशव्या, कुंडीत टाकलेले थर्माकोलचे साहित्य रस्त्यावर येऊन पडले आहे. वाहनचालकांना या कचर्यातून आपली वाहने चालवावी लागत आहेत, मात्र घंटागाड्या चालकांचे या कचराकुंडी कडे लक्ष न गेल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित कचराकुंडीतील कचरा तात्काळ उचलून न्यावा अशी मागणी बुधवार पेठेतील नागरिकांमधून होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य हवे
सातारा शहरात कचरा ही एक समस्या बनली आहे. शहरातील सर्वच प्रभागातील कचराकुंडीतील कचरा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे. जे घंटागाडी चालक कुंडीतील कचरा उचलण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांना नगरपालिकेने किंबहुना आरोग्य विभागाने जाब विचारण्याची गरज आहे. ओवरफ्लो कचरा कुंड्यामुळे स्वच्छ सातारा सुंदर सातारा हे नगरपालिकेचे ब्रीद वाक्य केवळ नावालाच राहू नये यासाठी पालिकेने नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे.
– धनंजय जांभळे,
भाजप नगरसेवक.
बुधवार पेठेतील कचराकुंडी ओवरफ्लो
RELATED ARTICLES