पाटण:- शक्ती पंढरी दुर्ग दुर्गेश्वर रायगड ते भक्ती पंढरी श्री. पंढरपूर असा धारकरी-वारकरी यांचा आषाढ वारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पुन्हा श्री. क्षेत्र पंढरपूर ते रायगड असा सुरु झाला आसताना छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पालखी सोहळा रविवारी दुपारी २ वा. सुमारास स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळी तळबीड येथे आला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस छत्रपतींची भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतीस धारकरी – वारकऱ्यांनी अभिवादन करून हा परतीचा पालखी सोहळा रागडाकडे मार्गस्थ झाला. यावेळी श्री. विठ्ठू माऊली सह छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
तळबीड येथे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी दुपारी दोन वा. सुमारास आल्यानंतर तळबीड चे सरपंच जयवंतराव (नाना) मोहिते यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख महिंद गुरुजी, सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीचे शंकरराव कुंभार, मनोहर यादव, शंकरराव मोहिते, लक्ष्मण चव्हाण, अनिल भोसले, अनिल बोधे, निलेश फुटाणे, अनिस चाऊस, अविनाश पराडकर यांच्यासह तळबीड ग्रामस्थाःची उपस्थिती होती. सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी स्थळी पालखीची मिरवणूक काढून समाधीला प्रदिक्षणा घातली असता समाधी परिसर श्री. विठ्ठू माऊली सह छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घोषणांनी दणाणून गेला.. यावेळी शिवभक्त, तळबीड ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज पालखीचे दर्शन घेतले. तळबीड येथील काही वेळाच्या विश्रांती नंतर हा पालखी सोहळा किल्ले रायगडकडे माग्रस्त झाला.
जेष्ठ शुद्ध चतुर्थी ते आषाढ शुद्ध एकादशी असा हा २२ दिवसाचा पायी पालखी सोहळा शक्ती पंढरी दुर्ग दुर्गेश्वर रायगड ते भक्ती पंढरी श्री. पंढरपूर, धारकरी-वारकरी यांचा आषाढ वारी पायी पालखी सोहळा स्वराज्याची राजधानी रायगड, श्री. जिजाऊमाता यांचे समाधी स्थळ पाचाड येथून सुरु होतो. तो छत्रपती शाहूमहाराज जन्म गाव गांगवली, मानगड, पुणे, फुरसुंगी, पाटस, लासुर्णे, इंदापूर, श्रीपुर, तोंडले, गार्डी, असा होतो. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला नगरप्रदिक्षणा श्री. विठ्ठूरायाचे दर्शन घेऊन हा पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीच्या प्रवासाला माग्रस्त होतो. या पालखीचा परतीचा प्रवास महूर, दिघंची, भवानीपुर, विटा, तासगाव, आष्टा, कराड, तळबीड, सातारा, मेढा, महाबळेश्वर, प्रतापगड, पोलादपूर, महाड, किल्ले रायगड- छत्रपती शिवाजी महाराज समाधी श्री. जगदिश्वर मंदिर, आणि श्री. जिजाऊमाता समाधी स्थळ पाचाड येथे या पालखी सोहळ्याची सांगता होते. असे पालखी सोहळा प्रमुख महिंद गुरुजी यांनी सांगितले.