सातारा: महिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यासाठी तीच्या अंतरमनातून येणारा आत्मविश्वास आणि धाडस हे तिला पाठबळ देत आहेत. याकरीता महिलांच्या दृष्टीतून जगाकडे पाहा, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजिका राजश्री गायकवाड यांनी सातारा शहरातील महिला पोलीसांसाठी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
यावेळी सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जेष्ठ पत्रकार विजय मांडके उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध उद्योजिका राजश्री गायकवाड यांच्या व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सातारा शहरातील 200 महिला पोलिसांना साडी व मिठाई देण्यात आली.
राजश्री गायकवाड पुढे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिला माणूस म्हणून जगण्याची संधी देऊन तिला तिचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास समाजातून प्रोत्साहन मिळावे. महिला सक्षमीकरणाचा अर्थ महिलांना भीक नको आहे, कोणाची दया नको आहे, तर त्यांना पुरुषांप्रमाणे समान संधी हवी आहे. आणि यासाठीच महिलासक्षमीकरण महत्वाचे ठरते.
आंदोलन असो किंवा कोणताही मोर्चा असो आमच्या महिला पोलीस तितक्याच ताकतीने बंदोबस्तात सहभागी होतात. ही बाब खूप महत्वाची वाटते. या सक्षम महिला पोलिसांसाठी छोटीशी भेट या लहान बहिणीकडून द्यावी हा विचार मनात आला आणि हा छोटासा प्रयत्न त्या करीता. येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला व फर्स्ट लेडी महिलाच्या मुलाखती असलेला ग्रंथ प्रकाशित करण्याचा मानस आहे.
यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील महिलांना येणार्या समस्यांचा मागोवा घेऊन त्या तरतुदी महिला धोरणात कराव्यात असे निवेदन आपण महिला आयोगाला व महिला आर्थिक विकास महामंडळ व महिला बालविकास मंत्र्यांना देणार आहोत असेहि त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यावेळी बोलताना या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले.
महिलांच्या दृष्टीतून जगाकडे पहा उद्योजिका राजश्री गायकवाड यांचे प्रतिपादन
RELATED ARTICLES