सातारा दि: सातारा जिल्ह्यातील शहरानजिक कोडोली येथे ब्रिटिश काळापासून ख्रिस्ती दफनभूमी आहे. या ठिकाणी ख्रिश्चन तथा ख्रिस्ती समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे मृत्यूनंतर दफन करण्याचे कार्यक्रम झाले आहेत. त्यामुळे भावनिकरित्या या जागेबाबत ख्रिस्ती बांधवांमध्ये श्रद्धा आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून बहाई समाजातील काही लोकांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बहाई दफनभूमी फलक व तार कुंपण केल्यामुळे ख्रिस्ती समाजात असंतोष पसरला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये ब्रिटिश काळापासून ख्रिस्ती बांधवांनी सातारा जिल्ह्यात स्थायिक होऊन विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. त्यांची तिसरी पिढी सातारा जिल्ह्यात कार्यरत असून या ठिकाणी चर्च सुद्धा आहेत. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सदर ख्रिस्ती बांधवांच्या दफनभूमीची सुविधा ही वाई, सातारा ,महाबळेश्वर या ठिकाणी आहे तर उर्वरित कोरेगाव, कराड, खटाव, माण, खंडाळा पाटण या ठिकाणी ख्रिस्ती दफनभूमी नसल्याने ख्रिस्ती बांधवांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंतिम विधी करण्यासाठी वाई ,सातारा व महाबळेश्वर या ठिकाणी नातेवाईक, हितचिंतक, आप्तेष्ट व मित्रपरिवार यांना धार्मिक विधि साठी यावे लागते. त्यापैकी कोडोली येथील ख्रिस्ती दफन भूमीची जागा दि.१४ जुलै २०१४ च्या सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बहाई समाजाला दिल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत गुप्तता पाळल्यामुळे ख्रिस्ती बांधवांना ही बाब नंतर लक्षात आलेले आहे. सदरच्या आदेशामुळे ख्रिस्ती बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे . समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम व इतर प्रगतीसाठी ख्रिस्ती बांधव ख्रिस्तवासी मोहन कांबळे यांचे १९९३ साली निधन झाल्यानंतर त्यांचेही दफन याच ठिकाणी केलेले आहे. त्यांची कन्या सौ. मयुरा गायकवाड या आपल्या वडिलांच्या दफनभूमीच्या जागी गेल्या असता त्यांना त्या ठिकाणी बहाई समाज्याच्या दफन भूमी फलक व तार कुंपण केल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. तसेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ यांच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष परीक्षित खुडे, युवक जिल्हाध्यक्ष आशिष खुडे व सहाय्यक सचिव मनोज कांबळे यांनी अतिरिक्त सातारा जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांची भेट घेऊन त्यांना सदर जागा हस्तांतरित करणारा आदेश रद्द करावेत. अशी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे .
सध्या नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांमध्ये एकोपा व कार्यक्रमाचे नियोजन सुरू असताना सदरची बाब उघडकीस आली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने याबाबत प्रामुख्याने बहाई समाज्याला इतरस्त्र जागा देऊन तोडगा काढून कोणते समाजावर अन्याय होऊ नये. अशी भूमिका घ्यावी. अशी मागणी होत आहे .