सातारा : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांसाठी खूप महत्वाची मोठी योजना आहे. ही योजना असंघटीत कामगारांसाठी वरदान ठरणार असून या योजनेमुळे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना योजनेचा देशपातळीवरील शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखवण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, नोडल अधिकारी गोपाल जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटीत कामगारांना न्याय देणारी योजना आहे. असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियमानुसार विविध व्यवसायगट यामध्ये बांधकाम कामगार, घरगुती कामगार, फेरीवाले, शेतमजुर, गृहउद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा, अंगणवाडी सेविका यासारख्या विविध 127 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या असंघटीत कामगारांनी या योजनेत आपल्या नावाची नोंदणी केलेली नाही, अशा असंघटीत कामगरांनी नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र शासन राबविणार आहे. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत 20 असंघटीत कामगारांची नोंदणी केली आहे. या योजनेच्या लाभासाठी असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणार्याचे कामगाराचे वय 18 ते 40 वर्ष असावे, मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असणारा व कर्मचारी राज्य बिमा निगम, भविष्य निर्वाह निधी आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसणारा कामगार पात्र असणार आहे. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांनी त्याच्या वयानुसार निर्धारित केलेल्या हप्त्यानुसार रुपये 55 ते 200 पर्यंत प्रतिमहिना अंशदान जमा केल्यास लाभार्थीस वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये निवृत्तीवेतन देय राहणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नजिकच्या नागरी सुविधा केंद्रात जावून नोंदणी करावी लागेल. ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक (ओटीपी) स्वत:चा अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीचा द्यावा तसेच पहिले अंशदानाची रक्कम रोख स्वरुपात अदा करावी. अंशदानाची रक्कम भरणा केल्याची पावती संबंधित नागरी सुविधा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्राकडून लाभार्थीस देण्यात येईल.
पहिले मासिक अंशदान जमा केल्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योनजनेंतर्गत एलआयीसीद्वारे पेन्शन खाते क्रमांक दिले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख, असंघटीत कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांसाठी वरदान ठरेल : जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES