सातारा : सातारा शहराचा झपाट्याने विस्तार आणि विकास होत आहे. दिवसेंदिवस नागरी वस्ती वाढत असून शहराच्या मध्यभागी, भरवस्तीत जिल्हा कारागृहाची इमारत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा कारागृह परिसरात नवीन बांधकाम करण्यास निर्बंध तसेच या परिसरात मोबाईल जामर असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा कारागृहामुळे अनेकदा संवेदनशील परिस्थिती निर्माण होत असते. या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा कारागृह शहराच्या बाहेर शासकीय जागेत हलवावे, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून जिल्हा कारागृहाची समस्या मांडली. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्रही दिले आहे. सातारा शहराच्या मध्यवस्तीत जिल्हा कारागृह आहे. याच ठिकाणी पोलीस मुख्यालय, शहर पोलीस ठाणे, सातारा नगरपरिषद कार्यालय, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय यासह अनेक खाजगी कार्यालये, संस्था, शाळा आणि विविध व्यावसायिक दुकाने आहेत. जिल्हा कारागृह हे नागरी वस्तीत असून कारागृहाच्या आसपास हजारो लोक वास्तव्यास आहेत. तसेच कारागृहालगतच पोलीस वसाहतही आहे. शासनाच्या निकषांनुसार जिल्हा कारागृहाच्या परिसरात नवीन बांधकाम करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
कुटूंबातील लोकांची संख्या वाढल्याने संबंधीत कुटूंबाला घराचा विस्तार करणे अनिवार्य असते. मात्र जिल्हा कारागृहामुळे अशा अनेक कुटुंबांना त्यांच्याच जागेत नवीन घराचे बांधकाम अथवा विस्तार करता येत नाही. यामुळे नागरिकांनी जिल्हा कारागृह शहराबाहेर हलवण्याची मागणी वारंवार केली आहे. शहरात सर्वच ठिकाणी शहरीकरण आणि विस्तार झाला असून कारागृह परिसरात मात्र शहरीकरणाला वाव मिळत नाही. तसेच या परिसरात मोबाईल जॅमर बसवल्याने परिसरातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातील कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जिल्हा कारागृहामुळे सदर नागरी वस्तीत अनेकदा तणाव निर्माण होत असतो. दररोज अनेक गुन्हेगार व कैदांची ने- आण होत असते. यामुळे जिल्हा कारागृहाचा परिसर नेहमीच संवेदनशील ठरत आहे. या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करुन नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्हा कारागृहाची इमारत नागरीवस्तीतून शहराबाहेर शासकीय जागेत हलवणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
सदर नागरी वस्तीतून कारागृहाची इमारत शहराबाहेर हलवल्यास पोलीस प्रशासनाचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. कारागृह शहराबाहेर हलवल्यानंतर मोकळी इमारत पोलीस प्रशासनाच्या वापरासाठी योग्य ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा कारागृह शहराबाहेर हलवण्यासाठी नागरिक आग्रही असून याबाबत तातडीने निर्णय घेवून नागरीकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.