कोरेगांव : कोरेगांव तालुक्यातील अंबवडे सं. वाघोली या गावामध्ये यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याबरोबर, शेतीचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा रहिला आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन आणि पिकांची प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रश्नी गावातील ग्रामस्थांनी विशेषतः तरूण पिढीने जलसंधारण कामाच्या माध्यमातून हा दुष्काळ हटविण्याचे काम हाती घेतलेले आहे. त्यांच्या आत्मविश्वासाला किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी कारखान्याच्या माध्यमातुन बळ दिले असून त्यांनी केलेल्या मदतीमुळे अंबवडे सं. वाघोली गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांसह, महिला आणि विशेष करून युवा पिढी हा पाण्याचा दुष्काळ मिटविण्यासाठी एकवटली असल्याचे प्रतिपादन, अंबवडे सं.वाघोली येथील कारखान्याचे सभासद आणि वसना पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सकुंडे यांनी केले.
किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील दुष्काळ व पाणी टंचाईचा सामना करणार्या गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी सामाजिक बांधिलकीतुन पोकलेन मशिन दिलेले आहे. अंबवडे सं. वाघोली (ता. कोरेगांव) येथील बेंद ओढा रूंदीकरण, खोलीकरण व इतर जलसंधारण कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, सचिन सांळुखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकुंडे पुढे म्हणाले, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या कल्पक नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक आणि व्यवस्थापनाने नेहमीच सहकार्याची भुमिका घेतलेली आहे. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोकलेन उपलब्ध करून दिला ही आमच्यासाठी निश्चितच आनंददायी बाब आहे. यानिमित्ताने आम्ही त्यांचे व कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानीत आहोत.
प्रारंभी यमुना नामदेव सकुंडे, अश्विनी संतोष पवार, मीराबाई श्रीरंग सकुंडे, वैशाली गोरख सकुंडे, मंदाकिनी बाळकृष्ण सकुंडे, सखूबाई शिवाजी सकुंडे व अलका गजानन चव्हाण यांच्या हस्ते पोकलेन मशीनचे विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी संचालक नंदकुमार निकम, सचिन सांळुखे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. दत्तात्रय फाळके, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश संकुडे, पोपट भोज, तानाजीराव निकम यांच्यासह गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, संचालक ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.