सातारा : सातारा जिल्हा फळे, भाजी-पाला, कांदा बटाटा अडत व्यापारी संघटनेच्यावतीने आज शासनाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या मुकमोर्चामध्ये सातारा, कराड,वाई, फलटण, लोणंद आदी शेती उत्पन्न बाजार समितीमधील 300 व्यपारी सहभागी झाले होते.
शेती उत्पन्न बाजार समिती सातारा येथून दुपारी 12.30 वा. व्यापार्यांच्या मुकमोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा पुढे पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ आश्विन मुद्गल यांना दिले आहे. यानंतर हा मुकमोर्चा प्रशासकीय ईमारतीमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर काढण्यात येऊन जिल्हा उपनिबंधक देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आज झालेल्या मुकमोर्चाला सातारा जिल्हा हमाल, मापाडी यांनी पाठिंबा दिल्याची माहिती सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी गटाचे संचालक सोमनाथ धुमाळ यांनी दिली.
मुक मोर्चामध्ये फळे,भाजी-पाला आडते असोसिएशन सातारा अध्यक्ष प्रविण कांबळे, उपाध्यक्ष फारूख बागवान, महमद अली बागवान, सचिव विजय केंडे, सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी गटाचे संचालक सोमनाथ धुमाळ, तानाजी चव्हाण, सोमनाथ शिंदे, कराडचे वसंतराव अळंबे, सईद बागवान, सुरेशदादा थोरात, फलटण बाळासाहेब ननावरे, प्रजनन अहिवळे, लोणंद आदिकशेठ शहा, वाई अजय मांढरे, नाना शिंदे यांच्यासह 300 ते 400 व्यपारी सहभागी झाले होते. दरम्यान, या निषेध मोर्चानंतर सर्व व्यापार्यांची तातडीची बैठक हॉटेल राधिका पॅलेस येथे घेण्यात येऊन राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
चार मंडईचा पदाधिकार्यांचा संपाला पाठिंबा
आडत व्यापार्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सातारा शहरातील समर्थ भाजी मंडई, श्री. छ. प्रतापसिंह महाराज भाजी मंइर्ड, महात्मा फुले भाजी मंडई व राजवाडा येथील भाजी मंडईतील विक्रेत्यांनी दि. 13 जुलैपासून शेतीमालाची विक्री न करण्याचा निर्णय घेऊन पुर्ण पाठिंबा व्यापार्यांना दिला असल्याचे सोमनाथ धुमाळ यांनी सांगितले.