वडूज : गिरजाशंकरवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीने सन 2007 ते 2017-18 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट कारभार केला आहे. या भ्रष्ट कारभारास जबाबदार असणार्यांची सखोल चौकशी करावी. तसेच ग्रामसेविका सौ. एस. एस. देटके यांना निलंबीत करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गोविंद थोरवे हे गेली काही दिवस लढा देत आहेत. मात्र या मागणीस प्रशासन योग्य प्रकारे सहकार्य करत नसल्याच्या निषेधार्थ सोमवार दि. 31 डिसेंबर रोजी श्री. थोरवे मंत्रालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्मदहन करणार आहेत.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. थोरवे यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, 2007 ते 2018 या काळात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेविकेने विकास कामांसाठी आलेला लाखो रुपयांच्या निधीचा कागदोपत्री वापर करुन खिशात घालण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षारोपनाची बोगस कामे दाखविणे, बोगस विहीर खुदाई प्रकरणे केली आहेत. रोगजार हमीच्या कामसाठी गावातील 25 टक्के लोकांचासुध्दा सहभाग नव्हता. असे असताना बोगस मस्टर करुन निधी हडपण्याचा प्रयत्न झाला आहे. 13 व्या वित्त आयोगातून झालेली नवीन गटर बांधणी, गटर दुरुस्ती, डिजीटल कॅमेरा खरेदी, रस्ते वाहतुक दुरुस्ती, अंगणवाडीची रंगरंगोटी, पाईपलाईन खुदाई, साहित्य खरेदी आदी कामातही मोठ्या प्रमाणावर अनागोंदी झाली आहे. चौदाव्या वित्त आयोगातून झालेले पाणीपुरवठा विहीरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या निकृष्ट कामांमुळे जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. डोंगर पठारावर असणार्या पवनचक्यांची नोंद न केल्यामुळे ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडला आहे. ग्रामपंचायतीने केलेली अंत्योदय लाभार्थ्यांची यादी चुकीच्या पध्दतीने केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. तर या योजनेचा लाभ धनदांडग्यांना मिळत आहे.
वरील कारभाराबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता ग्रामसेविका सौ. देटके यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्याबरोबरच आपले नळ कनेक्शन तसेच इतर कामे रखडविल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या विषयासंदर्भात श्री. थोरवे यांच्या गेली अनेक दिवस तक्रारी आहेत. त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासंदर्भात सोमवार दि. 24 रोजी सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, औंध पोलीस ठाणे अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक लावली आहे.
गिरजाशंकरवाडी ग्रा.पं. च्या भ्रष्टाचार चौकशीसाठी मंत्रालय इमारतीवरुन उडी मारण्याचा इशारा
RELATED ARTICLES