मलकापूर: पेट्रोलपंप चालावा म्हणून रस्ता 100 फुटी करायचा, 25 हजार घ्यायचे आणि मीटर विकत द्यायचे, कंपनीचे भले व्हावे यासाठी 3000 घ्यायचे आणि मैला उपसायचा, असे लोकांना लुबाडण्याचे किती धंदे मलकापूरच्या सत्ताधार्यांनी सुरू केले आहेत, याची माहिती घेऊन त्याची शासनस्तरावर योग्य ती चौकशी लावण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्यावतीने आगाशिवनगर येथे आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते होते.
व्यासपीठावर राज्य सहकार परिषदचे अध्यक्ष नामदार शेखर चरेगावकर, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शेतीमित्र अशोकराव थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, आर. के. भोसले, भाजपाचे शहराध्यक्ष सूरज शेवाळे, मलकापूरचे विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, माजी नगराध्यक्ष आबा गावडे, चंद्रकांत देसाई, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, मोहनराव जाधव, इसाक मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
मलकापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मलकापूरसह आगाशिवनगर व शास्त्रीनगरातील नागरिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करून प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे. या जाहीर सभेत मंत्री पाटील यांनी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आणि त्यांचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत, शहराच्या विकासासाठी भाजपला साथ करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
मुख्यमंत्रीपद असताना ज्यांनी काही केले नाही ते आत्ता काय या भागाचा विकास करणार? अशी टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता करून मंत्री पाटील म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार असल्याने जो काही विकासनिधी प्राप्त होत आहे तो भाजप सरकारमुळेच मिळत आहे. मलकापूरमध्ये गेल्या 10 वर्षात जो काही भष्ट्राचार झाला आहे, त्याची चौकशी लावली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नामदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, की मलकापूरच्या सत्ताधार्यांनी विरोधकांशी सुडबुद्धीने वागत 1450 लोकांवर आरक्षण टाकून, त्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम केले आहे. स्वत:चा पेट्रेलपंप चालावा म्हणून या सत्ताधार्यांनी चक्क हायवेची वाहतूक गावातून आणण्यासाठी 100 फुटी रस्त्याचा घाट घातला. आत्तापर्यंत त्यांनी केवळ फसवाफसवीचे राजकारण केले आहे. या शहरात जबाबदार राज्यकर्ते निवडून देण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नामदार शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, मदनराव मोहिते, अशोकराव थोरात यांनीही आपल्या भाषणातून सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचत जोरदार टीका केली.
याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पवार, कृष्णा बँकेचे संचालक महादेव पवार, पैलवान आनंदराव मोहिते, डॉ. राजेंद्र पाटील, कोयना वसाहतचे सरपंच राजू पाटील यांच्यासह मलकापूर परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांचं गॅरेज पण आहे का?
आपल्या भाषणात नामदार भोसले यांनी मलकापूरच्या सत्ताधार्यांच्या कारभाराचा पाढा वाचताना सांगितले, की विक्रमी 43 कोटी खर्च करून ड्रेनेजचे सर्वांत निकृष्ठ काम करण्याचे काम त्यांनी केले आहे. रस्त्यावर इतक्या उंचीवर चेंबर आले आहेत, की एखाद्या गाडीचा चेंबरही फुटु शकतो. अशावेळी चंद्रकांतदादा लगेच म्हणाले, की त्यांचे गॅरेजही आहे का? यावेळी अतुलबाबा म्हणाले, दादा यांचे काय-काय उद्योग आहेत, याची एक मोठी जंत्रीच तयार होईल.
मलकापूरातील सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी लावणार:चंद्रकांतदादा पाटील
RELATED ARTICLES