पक्षांतर करणार्यांनी पंधरा वर्ष काय केले – पवारांचा उदयनराजेंना टोला, रामराजे राष्ट्रवादीतच?
सातारा : दिल्ली दरबारात अपमान झाला म्हणून छत्रपती शिवरायांनी आग्रा दरबारातून निघून गेले. आता मी एवढेच म्हणेन हे बरं नाही तुमच्याकडे पंधरा वर्ष सत्ता असताना तुम्ही काय केले? असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला. येथील कल्याणं रिसॉर्टच्या संवाद मेळाव्यात नेहमीच्या पॉवर बाज शैलीत जोरदार फटकेबाजी महाराष्ट्राचा स्वाभिमान चुकीच्या हातात जाऊ देऊ नका काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन शरद पवार यांनी मतदारांना करत पक्षांतर करणार्या नेत्यांच्या विरोधात दंड थोपटले. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करणारे पवार संवाद मेळाव्यानिमित्त प्रथमच सातार्यात आले होते.
पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात सोळा हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या अशी सरकारची आकडेवारी आहे. राज्यकर्ते ना दुष्काळाकडे ना पुराकडे लक्ष देतात आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे किल्ले मात्र हॉटेलसाठी देण्याचा घाट राज्य शासन घालत आहे. काही दिवसांनी येथून छुम छुमचे आवाज यायला सुरवात होतील. आग्रयाच्या तहात छत्रपती शिवरायांनी उपमर्द झाला म्हणून रागाच्या भरात दरबार सोडला होता मात्र नजरकैदेत ठेवल्यानंतरही राजे युक्तीने आग्रा येथून बाहेर पडले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी पुन्हा इतिहास घडवला. यानंतर आणि आता? असा प्रश्न विचारताच रिसॉर्टच्या लॉनवर जोरदार हशा पिकला. पण हे वागणं बर नव्हं अस म्हणतं पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. मतदार संघाच्या विकासासाठी भाजपामध्ये जाणार्यांनी पंधरा वर्ष काय केले? अशा शब्दात पवारांनी उदयनराजे यांचे नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या.
महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही
शरद पवारांनी संवाद दौर्यातील राज्यव्यापी अनुभव कथन करताना सांगितले की आजच्या युवा पिढीला लाचारी पसंत नाही. अनेक जण माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित करतात? कोण म्हणतोय मी म्हातारा झालोय असा सवाल करत पवार म्हणाले प्रश्न विचारणार्यांनी काय पाहिलय माझ्यात वीस तास काम करेल पण महाराष्ट्राचा स्वाभिमान चुकीच्या हातात जाऊ देणार नाही. राष्ट्रवादीच्या या विराट मेळाव्यात दीपक पवार यांनी त्यांच्या बूथप्रमुखांसह राष्ट्रवादीत वाजतगाजत प्रवेश केला. मी कोणाच्या नेतृत्वाखाली आमदार होईल ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच अशी स्तुतीसुमने जावलीच्या पवारांनी बारामतीच्या पवारांवर उधळली.
जयंतरावांचा सल्ला ऐकला नाही
महाराष्ट्र धर्म ज्यांनी शिकवला त्यांची ही गादी आहे. या गादीचा आपणा सर्वांना अभिमान आहे. जयंत पाटील यांनी मला या प्रकरणाकडे (उदयनराजे यांचे पक्षांतर) लक्ष देण्याची विनंती जयंत पाटील यांनी केली होती मात्र मी विनंती न ऐकल्याची कबुली पवारांनी उदयनराजे यांचे नाव न घेता दिली. या विषयावर मी आता बोलणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, सत्यजित पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्राचा स्वाभिमान चुकीच्या हाती जाऊ देणार नाही
RELATED ARTICLES