सातारा : कोरेगाव तालुक्यातील जनता आजही माझ्यावर प्रेम करीत आहे. ताई तुमची तालुक्याला गरज आहे, असे लोक मला भेटून सांगत आहेत. पण त्यावेळी दारू, मटणे खावून माझा परावभव केला. आता मला पुन्हा तो धोका पत्करायचा नाही. कोरेगाव मतदार संघाची रचना पुर्वीची राहिलेली नाही. सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील जनतेने मला पुन्हा विश्वास देणार असेल आणि दारू, मटणाच्या मागे जनता पळणार नसेल तर मी स्वत: अथवा माझ्या परिवारातील कोणताही सदस्य आगामी विधानसभा लढण्यास तयार आहे, असे वक्तव्य माजी महसुलमंत्री व कोरेगाव तालुक्याच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत करून राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान माझ्या दहा वर्षाच्या काळात मंजूर झालेली विकासाची कामे आजही सुरू आहेत. विद्यमान आमदारांनी तालुक्याच्या विकासासाठी किती निधी आणला हे जाहिर करावे अशी टीकाही आ. शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता केली.
मी 15 वर्षापुर्वी घेतलेल्या मराठा आरक्षण भुमिकेचा विजय झाला म्हणून कोरेगावमध्ये माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा सत्कार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी मी आज मुंबईतून कोरेगावमध्ये आले आहे. असे सांगून शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या, मी दहा वर्षानंतर पत्रकार परिषदेला सामोरे जात आहे. शेतकर्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सह. साखर कारखाना गिळकृंत केला. न्यायालयीन बाब असल्यामुळे त्यावर मी योग्यवेळी बोलणार आहे. आपण जे बोलतो, ते करून दाखवतो. कारखाना शेतकर्यांच्या मालकीचा व्हावा यासाठी शेवट पर्यंत आपण पाठपुरावा करीत रहाणार आहे. न्यायालयात कारखान्यावर 25 खटले चालू आहेत. त्या खटल्यांचा खर्च मी माझ्या मिळणार्या पेन्शनमधून करीत आहे. पण याची परतफेड एकना एक दिवस निश्चितच करावी लागणार आहे.
शालिनीताई पाटील तुम्ही आता पुन्हा कोरेगावच्या राजकारणात सक्रिय होणार का? असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या. माझी तब्बेतीने मला साथ दिली तर मी नक्की विचार करेन. मला चालताना त्रास होत असला तरी माझी बुध्दी आजही काम करीत आहे. मला कोणत्याही गोष्टींचे विस्मरण झालेले नाही. दुख: एकाच गोष्टीच वाटते की, एवढ करूनही दारू आणि मटणाच्या एका तुकड्याच्या मागे पळतात लोक पळतात याचे मोठ दु:ख वाटते. अनेक लोकांनी माझे कोरेगावमध्ये स्वागत केले. अनेकांनी माझी भेट घेवून ताई तुम्ही कोरेगावकरांचे पुन्हा नेतृत्व करा असे सांगत आहेत. पण पुर्वीचा कोरेगाव मतदारसंघ राहिलेला नाही. सातारा आणि खटाव तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश झालेला आहे. या तिन्ही तालुक्यातील जनतेचा व प्रमुख पदाधिकार्यांना मला विचारावे लागणार आहे. खासदारांचे काम माझे कार्यकर्ते करीत असतात. कोरेगाव विधानसभेसाठी मला तीन्ही तालुक्यातील लोकांनी विश्वास दिला तर मी पुन्हा कोरेगाव मतदार संघाचे नेतृत्व करण्याचा विचार करेन, अन्यथा पुन्हा धोका पत्करणार नाही. निवडणुकीत मी स्वत: अथवा माझ्या परीवारातील सदस्य निवडणुक लढवेल, असे माजी आ. डॉ. शालिनीताई पाटील यांनी शेवटी सांगीतले.
मी आमदार असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला होता. अर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे अशी माणगी आपण त्यावेळी केली होती. प. महाराष्ट्रासह, मराठावाडा, विदर्भ असा संपूर्ण राज्याचा दौरा केला होता. तीन महिने दौरा करीत होतो. अर्थिक निकषावर मी विधानसभेत भाषण केले. त्यावेळी एकाही आमदारांनी उठून पाठींबा दिला नव्हता, किंवा विरोधही केला नाही. डॉ. शालिनीताई पाटील यांनी सभागृहात ठराव सादर केला इतकीच नोंद झाली. 2004 साली राज्यात पुन्हा दोन्ही काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी मराठ्यांना नोकरीमध्ये आरक्षण देवू असे आश्वासन जाहिरनाम्यातून दिले होते. त्यावेळी मी राष्ट्रवादीची आमदार होते. आरक्षणाच्या भुमिकेवरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून काढून टाकले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला हा आपल्या भुमिकेचा विजय आहे. 15 वर्षांनी माझ्या लढ्याला यश आले आहे, असे शालिनीताई पाटील यांनी यावेळी सांगीतले. शालिनीताई पाटील शरद पवारांवरही टिका करायला विसरल्या नाहीत. आरक्षणाचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आणि आम्ही निर्णय घेतला असे सगळीकडे शरद पवार सांगत सुटलेत. खा. शरद पवार हे आज एक बोलतात आणि उद्या दुसरेच बोलतात. पण मी माझ्या बोलण्यावर ठाम असते, असा टोला शरद पवार यांना लगावला.
राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदेच्या विरोधात शालिनीताईंंनी फुंकले रणशिंग मी अथवा परिवारातील सदस्य कोरेगावातून विधानसभा निवडणुक लढवेल

RELATED ARTICLES