सातारा – : कोरोनाच्या आजाराला रोखण्यासाठी राज्य शासनाने अखेर इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द केला आहे .त्यामुळे सातारा जिल्ह्यातील तब्बल 36 हजार 581 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे .दरम्यान इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा ही होणार नसल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे .सातारा जिल्ह्यात सातारा 16, जावली 6, कराड 24, पाटण 10, कोरेगाव 10, खटाव 14 ,खंडाळा4,फलटण 11 ,महाबळेश्वर 4. वाई 8, माण 9 अशा एकूण मिळून 116 केंद्रांवर 36 हजार 581 विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी बसले होते .भूगोल आणि कार्य शिक्षणाचा पेपर रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गाला मोठा दिलासा मिळाला .
मात्र आता या विषयांच्या गुणा बाबत संभ्रम कायम आहे .अशाप्रकारे परीक्षा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या विषयांचे गुण कसे दिले जाणार विहित कार्यपद्धती म्हणजे काय? या पेपरचे गुण कसे आणि किती ग्राह्य धरावेत ?का धरू नये.याबाबतचा निर्णय मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची समिती घेणार आहे असे समजते .याशिवाय इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याआहेत .ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रामधील चाचणी परीक्षा प्रात्यक्षिक यांमधील गुण त्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे .जिल्ह्यातील नववीचे 44 हजार 729 विद्यार्थी तर अकरावीचे 38 हजार 814 विद्यार्थ्यांच्या परीक्षेची धास्ती संपली आहे. गेल्या 22दिवसांपासून विद्यार्थी व पालकांमध्ये परीक्षेबाबत असलेल्या संभ्रामाला आता पूर्णविराम मिळाला आहे .दरम्यान जिल्हा परिषद पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 31 हजार 599 विद्यार्थी या सर्वांना दिलासा मिळाला आहे.सर्वच विद्यार्थ्यांना लॉक डाऊन काळात अभ्यास करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत .त्यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप करून दररोज त्या त्या विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास देत असल्याची माहिती सातारा जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातून देण्यात आली.