सातारा :- कामगार हक्क कायद्यानुसार नोकरीच्या ठिकाणी फक्त 8 तासांची डय़ुटी असते. 8 तास भरले की झाले असा तो विषय मात्र पोलीस दलाच्या नशिबात नाही. आपतकालीन परिस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांसह शेवटच्या पोलीस शिपायांपर्यंत तसे सर्वजण 24 तास बांधीलच असतात. सध्या दिवसा व रात्री पोलीस कर्मचारी 12, 12 तास डय़ुटी करत आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी सातारा शहरातील सीमांवर नाकेबंदी करण्यात आली आली आहे. त्या चेकपोस्टवर पोलीस कर्मचाऱयांना देण्यात आलेली रात्री 9 ते सकाळी 9 ही 12 तासांची नाईट डय़ुटी पोलिसांना जीवघेणी ठरु नये, यासाठी त्यात पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत पर्यायी नियोजनाची गरज व्यक्त होत आहे.
कोरोना संसर्ग होवू नये म्हणूनच जिल्हय़ातील पोलीस दल, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, महसूल विभागातील अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांसह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका प्रचंड मेहनत घेत आहेत. यामध्ये कोणाच्याही कामाची तुलना होवू शकत नाही. कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या प्रत्येक घटकाला जनता सलामच करत आहे. मात्र, हीच जनता रस्त्यावर येवू नये म्हणून जीवावर उधार होवून बंदोबस्त निभावत असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱयांना येत असलेल्या काही अडचणींकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याची गरज आहे. बुटात थोडा बदल केला आता नाईट डय़ुटीतही थोडा करा, अशी अपेक्षा कर्मचारी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे ‘तरुण भारत’च्या माध्यमातून करत आहेत. सध्या पुणे व मुंबईकडून काही नागरिक जिल्हय़ाच्या सीमा बंद असताना सीमाबंदीचा भंग करुन जिल्हय़ात विनापरवानगी प्रवेश करत आहेत. यासाठी मग ज्या पध्दतीने जिल्हय़ाच्या सीमांवर बंदोबस्त तैनात केला आहे तसाच तो सातारा शहरात तैनात आहे. येथील मोळाचा ओढा, वाढेफाटा, बोगदा, अंजठा चौक, बाँबे रेस्टारंट आदी ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून तिथे चेकपोस्ट आहे. येणाऱया वाहनांची चौकशी करुन त्यांना जिल्हय़ात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय घेतला जातो. या डय़ुटीमुळे चेकपोस्टवर नाईट डय़ुटी करणाऱया कर्मचाऱयांना मानसिक व शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.