सातारा : सातारा – लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करावी, अशा आशयाचे निवेदन भाजयुमोचे सातारा जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
सातारा – लोणंद मार्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. सातारा जिल्ह्याला हा मार्ग मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलंगाणा तसेच दक्षिण भारतातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढलेली आहे. अनेक अवजड वाहने राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील टोल वाचविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे सातारा- लोणंद मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे सामान्य लोकांना व छोट्या वाहनधारकांना जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागते. या मार्गावर रोज छोटे-मोठे अपघात होत असतात. अनेकांना हकनाक प्राण या अपघातांमध्ये गमवावे लागले आहेत, तसेच काहींना कायमस्वरुपी अपंगत्वही आले आहे. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडलेले आहेत. पन्नास टनांपेक्षा अधिक वजनाची वाहने (मल्टिएक्झल) या मार्गावरुन दर मिनिटाला वाहतूक करीत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना रस्त्यावरुन प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. सध्या सातारा- लोणंद मार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे. आरळे येथील कृष्णानदीवरील पूल शेवटची घटका मोजत आहे. या पुलाला उणीपुरी 200 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या पुलाचा एक चिरा जरी निखळला तरी महाडजवळील सावित्री नदीवर झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याच पुलावरुन पन्नास टनांपेक्षा जास्त वजने असलेली वाहतूक केली जात असल्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होवू शकतो. तसेच देऊर येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपुल नसल्यामुळे दर अर्ध्या तासाला रेल्वेच्या फेर्या सुरु असतात. त्यामुळे दर अर्ध्या तासाला याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे अनेक लोकांचा वेळ वाया जातो. तसेच आर्थिक नुकसानही होत असते. याला जबाबदार कोण? तसेच वाढे येथील वेण्णा नदीवरील पुलही शेवटची घटका मोजत आहे. या पुलावर यापूर्वी भीषण अपघात झालेले आहेत. तसेच सातारा लोणंद रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण नसल्यामुळे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संपूर्ण रस्ताच खड्ड्यात गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातारा-लोणंद मार्गाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी वारंवार मागणी केलेली आहे. परंतू शासनस्तरावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली असता या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग मंजूर झालेला आहे. त्यामुळे लवकरच राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होणार आहे. अशा पद्धतीचे गाजर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दाखविले जात आहे. महामार्गाचे काम जेव्हा व्हायचे तेव्हा होईल. परंतू या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे अनेक भीषण अपघात यापूर्वी झालेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी तसेच शासनस्तरावर संबंधित विभागांना आदेश देण्यात यावेत, याबाबतचे निवेदन सातारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहे.
सातारा – लोणंद मार्गावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करावीः निलेश नलवडे
RELATED ARTICLES