कराड: आपल्या आई-वडिलांनी खूप कष्ट करून आपल्याला उच्च शिक्षण दिले आहे, हे विसरू नका. ज्या माळरानावर कुसळे उगवत नाहीत तिथे तुम्हाला समृद्ध शिक्षण मिळत आहे, हे समाजाने पुरवले आहे. ज्या समाजामुळे आपण उभे आहे, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून कार्य केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांनी व्यक्त केले.
श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव (ता.कराड) येथे फार्मसी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांच्याहस्ते स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.
यावेळी शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ.ईला जोगी, संस्थेचे सीईओ प्रदीप कबाडे, प्राचार्या डॉ.प्रज्ञा पाटील, प्राचार्य डॉ.विजयानंद आरलेलीमठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सीईओ प्रदीप कबाडे होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.साळुंखे पुढे म्हणाले, पदवीनंतरचे जीवन आयुष्याची पहिली पायरी आहे. या मार्गात खूप अडथळे पार करावे लागतील, अविरत कष्ट करावे लागेल. याप्रसंगी विचारपूर्वक काम करा, स्वतःचे जीवन समृद्ध करा व आपले कर्तव्य सिद्ध करा. स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीबरोबर समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. आयुष्यात जो मागे वळून बघतो तो जीवनात यशस्वी होतो.
आजच्या प्रगत तंत्रज्ञान व सोशल मिडीया यावर बोलताना ते म्हणाले, आजच्या काळात तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. इंटरनेटमळे जग खूप जवळ आले आहे.
घरबसल्या तुम्हाला जगाची कोणतीही माहिती उपलब्ध होते. सोशल मिडीयामध्ये आलेली माहिती न वाचता पुढे पाठवली जाते ती तपासून पाहिली जात नाही ही चिंतेची बाब आहे. मिळालेली माहिती जशीच्या तशी खरी समजू नका. त्यासाठी तुमच्या बुद्धीची कसोटी लावा. तपासून बघा. चिकित्सा करा व समाजाला निर्दोष माहिती पोहोचवण्याची दक्षता घ्या.
संस्थेचे सीईओ प्रदीप कबाडे यांनी मान्यवरांचे बुके देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रणिता अरगडे व लोखंडे यांनी केले. तर प्राचार्य विजयानंद आरलेलीमठ यांनी उपस्थित मान्यवर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे आभार मानले.
जीवनात आई-वडिल व समाजाचे ऋण केव्हाही विसरू नका ः डॉ.आ.ह.साळुंखे
RELATED ARTICLES