फलटण : पंधरा दिवसापूर्वी फुटलेल्या मुख्य पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईन मधून लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता व कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणाचा त्रास नागरिकांना होत आहे.
फलटण शहरात पाणी समस्येत वाढ झाली असून पाणी पुरवठा विभाग यांनी शहरातील पाणी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वी नगर परिषदेच्या सुरू असलेल्या कामामुळे लक्ष्मीनगर भागात पाणीपुरवठा करणारी पाईप फुटली होती यानंतर याठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला जो आजअखेर दुरुस्ती न केल्यामुळे तश्याच अवस्थेत आहे. रोज पाणीपुरवठा सुरू होताच या खड्यात पाणी जमा होते व पाणी गेल्यावर ते दूषित व गढूळ पाणी पुन्हा पाईपमध्ये जात आहे त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात हे दूषित व गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना अनेकवेळा तक्रार दाखल करूनही सदर कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
संबधित पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांचा फोन अनेक वेळा बंद असतो आणि ज्या वेळी फोन सुरू असतो त्यावेळी फोन केला असता ते फोन उचलत नाहीत असा अनुभव नागरिकांना येत आहे.
रात्रीच्या वेळी खोदून ठेवलेल्या खड्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता असल्याने सदर काम त्वरित करून खड्डा बुजवण्याची मागणी नागरिक करीत आहेत. सध्या कडक उन्हाळा सुरू असून पाणी पुरवठेचे योग्य नियोजन व जलद गतीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना पाणी पुरवठा विभागातील अभियंता जबाबदारी पूर्वक त्यांचे काम करत नसल्याने याबाबत कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न नागरिकांच्या पुढे उभा राहिला आहे.
फुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा
RELATED ARTICLES