सातारा : लोकशाही व्यवस्थेने सर्वसामान्यांना दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार बजावण्यासाठी निवडणूका असतात. मी उदयनराजे म्हणून नव्हे तर जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत आहे. माझी लढाई सत्तेसाठी नसून सत्यासाठी आहे, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षात देशावर सत्ता गाजवणार्या सरकारने गोरागरिबांसाठी काय केले याचा आलेख मांडला तर केवळ जनतेच्या भावनांस हाक घालण्याचेच काम त्यांनी केले आहे. दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करु अशा खोट्या आश्वासनांच्या बळावर त्यांनी जनतेस फ़सवले. म्हणूनच या निवडणूकीत अशा घोषणा बहादुरांना धडा शिकवायला हवा. सामान्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये आणि 2 कोटीं लोकांना रोजगार मिळालाच नाही. त्याऐवजी नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना आणखी गाळात घालण्याचे काम त्यांनी केले आहे. सत्तेच्या केंद्रीकरणातून अहंकार निर्माण झाल्याने, मी करेन तोच कायदा आणि मी दाखवेन, तीच पूर्व दिशा अशा हेकेखोरे वृत्तीच्या जातीयवादी व सत्तांध नेत्यांमुळे देश रसातळाला जात आहे.
लष्करी जवान, क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या अस्सिम त्यागातून देशाची जडण – घडण झाली आहे. मात्र काही ़फुटकळ लोकांमुळे पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीसारखे संकट देशावर येऊ पाहत आहे. अशी टिका करुन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले की, निवडणूक म्हणजे देश वाचवण्याची चळवळ आहे. भारताचा रशिया आणि सोमालिया होऊ नये म्हणून यावेळी सत्तांतर घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा कारण एका सर्व्हेनूसार भारत हा जगातील सर्वात तरुण देश असेल असेही ते म्हणाले.
एस. ई. झेड. मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांना कारखान्यांमध्ये रोजगार मिळावा ही आमची आग्रहाची भूमिका होती आणि आहे. सर्वसामान्यांना सहकार्य न करणार्या मुजोर कारखानदारांना आम्ही जनतेची बाजू घेऊन काही सुनावले तर त्याला तुम्ही दहशत म्हणणार का ? तर जरूर माझी दहशत आहे. कारण ती सर्वसामान्यांवर होणार्या अन्यायाविरूद्धची लढाई आहे. असेही पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. तसेच माझी दहशत म्हणजे आदरयुक्त समाजकार्य आहे. म्हणूनच मी तळमळीने बोलतो आणि माझ्या जिवाभावाच्या मतदारांसाठी कोणालाही अंगावर घेतो, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या जादुच्या झप्पीचे विरोधी उमेदवारानेही अनुकरुन केले असल्याचे पत्रकारांनी लक्षात आणुन देताच, भले भले लोक माझी कॉपी करतात अशी प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
मी ….. मिलिटरी पोलीस
मेंबर ऑफ़ पार्लमेंट म्हणजे एमपी असे ओळखले जात असले तरी मी अन्यायाविरुध्द धावून जाणारा आणि गोरगरिबांच्या पाठीशी राहणारा एमपी म्हणजे मिलिटरी पोलीस आहे, असेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
मला माथाडींचा अभिमान
असंघटीक कामगारांना एकत्रित करुन त्यांची संघटना बांधणारे व त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने ध्यास धरलेले कै. आण्णासाहेब पाटील हे थोर विचारांचे महान व्यक्तीमत्व होते. त्यांचा मी आदरच करतो. त्यांच्या विचारामुळेच माथाडी कर्मचार्यांना कायदयाचे संरक्षण लाभले. तो कायदा अंमलात आणण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. विशेषतः दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक तसेच शरद पवार साहेबांनी माथाडी कामगारांना कायद्याचे संरक्षण देवून त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. त्या सर्वांचा आणि श्रमशक्तीचा संदेश देणार्या माथाडींचा मला अभिमानच वाटतो. असेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले.
माझी लढाई सत्तेसाठी नव्हे…. सत्यासाठी सातार्यात पत्रकार परिषदेत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन
RELATED ARTICLES