सातारा (एकनाथ थोरात): प्रति वर्षाप्रमाणे या वर्षीही गुढीपाडव्यापासून यात्रा जत्रेसाठी सुपारीवर करमनुकीचे कार्यक्रम ठेवण्यासाठी सातारा शहरातील खंडोबाचा माळा येथे तमाशा कलावंताचे फक्त चार फड दाखल झाले आहेत. यावर्षी लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लोकनाट्य तमाशा गावोगावी यात्रा, जत्रांच्या कार्यक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामदैवत यांची वार्षिक यात्रा ही ठरलेली असतेच यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाबरोबर निवडणूकीच्या आचारसंहितेला सामोरे जावे लागत आहे.
यावर्षी तमाशा राहुट्यामध्ये प्रसिध्द लोकनाट्य वग असणारे फडाचे मालक यामध्ये पापासाहेब सातारकर, मनिषा कवठेकर, बायना शारदा सातारकर, गोविंदराव पाटणकर यांच्या कन्या पुत्र दिपाली मिनाक्षी पाटणकर सोबत गोपाल पाटणकर असे नामांकित लोकनाट्य तमाशा मंडळाच्या राहुट्या सुपारीच्या प्रतिक्षेत आहेत. एका लोकनाट्य तमाशा मंडळात किमान 30 ते 40 कलाकारांचा सहभाग असतो. लावणी, ऑक्रेस्ट्रासह वग नाट्य धार्मिक सामाजिक रजवडी सादरकरण्यावर तमाशा मंडळाचा कार्यक्रमाचा सुपारी 25 ते 30 हजार रुपये असल्याने छोट्या गावात यात्रा जत्रेमध्ये तमाशाचा कार्यक्रम घेत असतात. चहा पाणी, जेवण, वाहतूक यामुळे कार्यक्रमाची सुपारी थोडीशी वाढ झाली आहे. तमाशाचा कार्यक्रम यात्रेत पार पाडण्यासाठी यात्रा समितीला पोलीस विभागासह विविध परवाने घ्यावे लागत आहे. तमाशा कार्यक्रमाच्या ठिकाणी तरुणामध्ये लावणीवरुन वन्स मोअर म्हणून वादाची ठिणगी पडत असते, अशावेळी यात्रा कमिटी पोलीस संरक्षण घेवून यात्रा सुरळीत पार पाडत असतात. मात्र यावर्षी आचारसंहितेमुळे तमाशाच्या सुपारीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कलाकार दिपाली पाटणकर यांनी दै. ग्रामोध्दारशी बोलताना दिली.
लोकसभेच्या आचारसंहितेमुळे तमाशाच्या कार्यक्रमास अल्प प्रतिसाद
RELATED ARTICLES

