पाल : मोदींवरील सिनेमा, मोदी टीव्ही वाहिनी यांना निवडणूक आयोग व न्यायालयाने निवडणुका होईपर्यंत घातलेली बंदी म्हणजे या सरकारला दिलेली चपराक आहे, सर्वसामान्य शेतकरी आणि बहुजनांचे सरकार आणण्यासाठी उदयनराजेंना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
पाल (ता. कराड ) येथे झालेल्या विराट सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, चंद्रकांत जाधव, अजितराव पाटील चिखलीकर, मानसिंगराव जगदाळे, बाळासाहेब सोळस्कर, जि.प. सदस्या सुरेखा जाधव, आण्णासाहेब पलंगे आदी प्रमुख उपस्थित होते.
भाजपच्या विरोधात आम्ही एकजूट दाखवल्याने आणि अपवाद वगळता एकास एक उमेदवार दिल्याने काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर येईल, हे केवळ माझे भाकीत नाही, तर राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे, असा विश्वास व्यक्त करून आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सन 2014 च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला अवघी 31 टक्के मते मिळाली आहेत. मतविभाजनामुळे आपला तोटा होत असल्याचे लक्षात आल्याने विरोधातील 65 ते 69 टक्के मतांची मोट बांधल्याने निश्चितच देशात परिवर्तन घडेल, भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले हे सरकार भ्रष्टाचाराने सर्वाधिक बरबटलेले आहे. राफेल विमान खरेदी हे याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. 526 कोटीचे एक विमान 1760 कोटींना करंदी करण्यात आले. अशा 36 विमानांच्या खरेदीत किमान 36 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे.
खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, जनतेने मनात आणले तर काहीही घडू शकते. मात्र त्यासाठी एकजूट हवी. देशात अमुक तमुकची लाट आहे, असे म्हणणं चुकीचं आहे. कारण लाट फक्त आणि फक्त समुद्राचीच असते. जर जनतेने मनात आणले तर समोरील व्यक्ती आणि सरकार लट लट कापल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लोकशाहीतील खरे राजे असनार्या जनतेने या निवडणुकीत परिवर्तन घडवावे. मन की बात करीत सत्ता मिळवलेल्या या सरकारने हातामध्ये सत्ता येताच घेतलेल्या अविचारी निर्णयांमुळे जनतेची अक्षरशः धुळदान केलेली आहे. जनतेची केवळ मते त्यांनी मिळवली, मात्र जनतेच्या वैचारिक मतांची काहीच किंमत ठेवली नाही. देशाची नैसर्गिक संपत्ती काही ठराविक उद्योजकांच्या दावणीला बांधून जनतेला अक्षरशः ओरबाडण्याचे काम या सरकारने केले आहे. सत्तेत गेल्यावर जनतेला विसरणार्या सरकारला धडा शिकवण्यासाठी सत्तांतराशिवाय पर्याय नाही. तरुणाई व विद्यार्थी ही देशाची संपत्ती व आधारस्तंभ आहे.त्यांना घडवूनच देशाला महासत्तेकडे नेता येईल, मात्र देशाचा खेळखंडोबा होऊ द्यायचा नसेल, तर अनेक राष्ट्रांना हेवा वाटावा असा भारत घडवूया. व्यापारी,उद्योजक, शेतकरी हे सर्व घटक सक्षम करण्यासाठी सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, शेतक-यांच्या हिताची भुमिका आदरणीय शरद पवार यांनी कायम घेतली. त्यांना ताकद देण्याने शेती आणि शेतक-यांचे भले होणार आहे. जिल्ह्यात कोणाच्या हातात सूत्रे द्यायची याचा निर्णय या निवडणूकीत घ्यायचा आहे.
देशात सर्वाधिक मताधिक्क्य उदयनराजेंना मिळावे हे साकडं खंडेरायाला घालायला इथं आलो. अब कि बार फिर नही मोदी सरकार हे लोकांनी आता ठरवलं आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
उन्हाळ्याचे, सुट्ट्यांचे दिवस असल्याने कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिक दक्ष रहावे व उदयनराजेंना भागातून सर्वाधिक मताधिक्य द्यावे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
शेतकरी, व्यापारी- विक्रेते व सर्वसामान्यांचे नुकसान करणा-या सरकारला पुन्हा सत्तेवर येण्याचा अधिकार नाही. या सरकारला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन आमदार आनंदराव पाटील यांनी केले.यावेळी देवराज पाटील, अजितराव चिखलिकर, बाळासाहेब सोळस्कर यांची भाषणे झाली. या प्रसंगी माणिक पाटील, भास्करराव गोरे, डी. बी. जाधवबापू, संजय थोरात, संजय जगदाळे, कांतीलाल पाटील, जयवंतराव साळुंखे, पालचे सरपंच जगन्नाथ पालकर, उद्धवराव फाळके, सर्जेराव खंडाईत, शहाजीराव क्षीरसागर, नंदकुमार बटाणे, संभाजीराव गायकवाड, रामभाऊ जगदाळे, प्रणव ताटे, सुषमा नागे, मानसिंग पाटील, हेमंत जाधव, तानाजी गोरे, आप्पासाहेब खंडाईत, मंगेश कुंभार तसेच पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.
…. तर भुवयाही काढून टाकेन,
जनतेने आजवर विश्वास ठेवला व मला निवडून दिले. तोच विश्वास पुन्हा एकदा ठेवून बघा. तो सार्थ न ठरल्यास मिशाच काय पण भुवयाही काढून टाकेन, असे, उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणात सांगताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.
न्यायालय, निवडणूक आयोगाची सरकारला चपराक: आ. पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES