चाफळ : दक्षिण महाराष्ट्रातील लाखो भाविकांसह परदेशी पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराममंदीरामध्ये सत् सीता रामचंद्र की जय…. प्रभु रामचंद्र की जय चा जयघोष करीत शेकडो धगधगत्या दिवट्यांच्या व मानाच्या सासन काठ्यांच्या साक्षीने असंख्य भाविक – भक्तांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करीत प्रचंड पुष्पवर्षावात अभूतपूर्व मंगलमयी वातावरणामध्ये 372 वा अभूतपूर्व श्रीराम नवमी जन्मसोहळा शनिवारी दुपारी 12.20 वाजण्याच्या सुमारास साजरा झाला. श्रीराम जन्म सोहळ्यावेळी भाविकांनी गुलालासह केलेल्या पुष्पवर्षावामुळे फुलांचा व गुलालाचा मंदीर परिसरात अक्षरश: सडा पसरल्याने संपूर्ण मंदीर परीसरातील वातावरण राममय झाले होते.
प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या दर्शनासाठी भाविकांनी शनिवारी सकाळ पासूनच प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मंदीर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. युवक -युवतीच्या झुंडीच्या झुंडी प्रभुराम नामाचा जयघोष करत गुलालमय वातावरणात न्हावून गेल्या होत्या. यात्रेचे नवमी, दशमी व एकादशी हे प्रमुख तीन दिवस असले तरी चैत्रशुध्द प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून या यात्रेस प्रत्यक्ष प्रारंभ होतो. मुख्य दिवशी म्हणजेच रविवारी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, 5.30 वाजता श्रीरामाची पूजा, रामनाम जप, 6 वाजता गीतापाठ, 8.30 ते 10 वाजता भजन व आरती घेण्यात आली. 11 ते 12 वाजता श्रीराम मंदीराला तेरा प्रदक्षिणा घालत श्रीराम मारुती, शंकर, देवी, कृष्णामाई, श्रीकृष्ण, गणपती अशा देवतांच्या आरत्या प्रदक्षिणाचे वेळी चालीवर म्हणण्यात आल्या. या श्रीरामनवमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दशरथ व कौशल्या माता यांच्या पोटी चैत्रशुध्द नवमीला दुपारी 12.20 वाजता श्रीरामाचा जन्म झाला. तोच दिवस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या श्रध्देने व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. मुख्य दिवशी प्रभुरामास अभ्यंगस्नान घातल्यावर त्यांची विधीवत पूजा, पौरोहित्य विधी पुरोहितांनी केला. श्रीरामास न्हाऊ घातल्यानंतर रामाला पाळण्यात घालण्यात आले. पाळणा गीतानंतर श्रीरामास अधिकारी स्वामी भूषण स्वामी व भार्गवी स्वामी यांच्या ओट्यात देण्यात आले. यावेळी के. बी. क्षीरसागर यांचे लळिताचे कीर्तन झाले. श्रीराम जन्मसोहळ्यानंतर सर्व भाविकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. लळिताचे कीर्तनास पेटीसाथ रामचंद्र देवरे यांनी केली तर वनारसे यांनी तबला साथ दिली.
दुसर्या दिवशी दशमीला दि. 14 रोजी सकाळी समर्थ वंशज चाफळनगरीतून फिरुन भिक्षावळ गोळा करतात. याच दिवशी सायंकाळी सात वाजता सवाया, आरती झाल्यानंतर शेकडो मशालींच्या उपस्थितीत रांगेतून श्रीराम व मारुतीची चांदीची मूर्ती पालखीमध्ये ठेवून छबीना काढला जातो. हा छबीना दर्शनी पायर्यावरुन रथाचे मानकरी साळुंखे बंन्धू यांच्यामार्फत रथाकडे नेला जातो. तद्नंतर रथामध्ये विमान ठेवण्यात येते. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी चाफळसह परीसरातील भाविक, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दि. 15 रोजी एकादशीला सुर्योदयाबरोबर श्रीरामाची विमानरुपी पालखीत प्रतिष्ठापना करुन रथातून सवाद्य मिरवणूक काढली जाते.
यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात्रा मध्यवर्ती कमिटी, कुस्ती कमिटी, भंडारा कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक यांनी परीश्रम घेतले. यात्रेचा नियोजन बध्द आराखडा श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष दिलीप पाठक, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, मानद मार्गदर्शक अरुण गोडबोले, विश्वस्त मारुतीबुवा रामदासी, भूषण स्वामी, गिरीष सोहनी, सौ. मानसी माचवे, चंद्रकांत पाटील, अनिल साळुंखे, अॅड. योगेश पेंढरकर, व्यवस्थापक बा. मा. सुतार व मध्यवर्ती यात्रा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी तयार करुन भाविकांसाठी सुविधा पुरविल्यामुळे भाविकांना यात्रेचा लाभ घेणे सुलभ झाले.
यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व 10 पोलीस कर्मचारी, होमगार्ड, महिला पोलिस असा चोख बंदोबस्त ठेवला होता.
प्रभू रामचंद्रकी जय…च्या गजरात रामजन्मोत्सव साजरा
RELATED ARTICLES