सातारा : या वेळेच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीला काँग्रेसची साथ, शेतकरी संघटनेसह रिपब्लिकन पक्ष, मनसे आदी मित्र पक्षांच्या आघाडीचे सहकार्य आहे. त्यामूळे लोकसभेचे आपले उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले निश्चितच प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. सातारा तालुक्यातूनही त्यांना अधिकाधिक मतदान करूया, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
लिंबखिंड- पानमळेवाडी येथील विठ्ठल मंगल कार्यालयात आयोजित लिंब व शाहूपुरी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेरमन सर्जेराव सावंत, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, प्रल्हादभाऊ चव्हाण, नंदाभाऊ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन खा. उदयनराजे भोसले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खा. उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिहराजे आदी प्रमुख मान्यवरांना एकत्रित मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारच्या मनमानी धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार, आणि सर्वसामान्य जनता असे कोणीही सुखी नाही, असे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, या सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे संपूर्ण देशाचे अर्थकारण बदलले. सुरळीत चाललेल्या बँका अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली. तसेच सहकार क्षेत्र कोलमडून टाकण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला.. जीएसटीसारख्या निर्णयामुळे वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला आहे. रेराच्या अंबलबजावणीमूळे जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणारे बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यामुळे सर्वांना त्रासदायक ठरणारे हे सरकार हटविण्याचा निर्धार या निवडणुकीत करूया. पूर्वी काय झाले याचा विचार न करता सर्वाधिक मतांनी उदयनराजे सलग तिसर्यादा लोकसभेत जावेत, यासाठी सर्वांनीच कार्यरत राहूया. उन्हाळ्याचे दिवस असले तरी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी गावोगावी आणि वाड्या – वस्त्यांवरही प्रयत्न व्हावेत.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आपला बहुमोल वेळ वादावादीत वाया घालवू नका. कारण वेळ एकदा गेली की पुन्हा ती आणू शकत नाही. वेळ सत्कारणी लावण्यासाठी कायमस्वरूपी गैरसमज ठेऊ नका. त्यातून आपणा सर्वांचाच तोटा होतो आणि नको त्यांचा फायदा होतो. म्हणून मन की बात करीत सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकवा आणि देशात सत्तांतर घडवा. कारण सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही. गांधीजींनी देशाला लोकशाहीचा मंत्र दिला आणि पंचायत राज संकल्पनेतून सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्व सांगितले, मात्र जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात सध्या सत्तेच्या केंद्रीकरणाचा डाव रचला जात आहे. हा देश लोकशाहीतील राजांचा आहे की उद्योगपती अंबानी, अदानी अश्या भांडवलदारांचा? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी विचित्र स्थीती निर्माण झाली आहे. नैसर्गिक गॅस, वायू, पाणी या राष्ट्रीय संपत्तीचे मालकी हक्क ठराविक उद्यागपतींना देऊन त्यांच्याकडून जनतेने ते विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यातून संबंधित उद्योगपती मालामाल होत आहेत. देशाच्या वार्षिक बजेटपेक्षा ह्यांच्या उलाढाली अधिक आहेत. आपण निर्धार केला तर त्या रकमेच्या निव्वळ व्याजातून गोरगरीबांना दोन वेळचे जेवण, मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा देत येतील त्यासाठी देशात परिवर्तन घडवलेच पाहिजे.
या वेळी बाळासाहेब गोसावी, किरण साबळे -पाटील, धर्मराज घोरपडे, तात्या वाघमळे यांचीही भाषणे झाली. या सभेस जिल्हा परिषद सदस्या अनिता चोरगे, पंचायत समिती सदस्या सरिता इंदलकर, वसुंधरा ढाणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राजेंद्र लवंगरे, पानमळेवाडी ग्रामपंचायतीचे आनंदा नलवडे, दत्तात्रय चव्हाण आदीसह लिंब व शाहूपुरी जिल्हा परिषद गटातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा तालुक्यातून उदयनराजेंना अधिकाधिक मतदान करूया
RELATED ARTICLES