सातारा : माझी लढाई छत्रपतींशी नाही, उदयनराजे भोसले यांच्याशी आहे.माझी समोरा समोर यायची तयारी आहे. त्यांनी वेळ, ठिकाण जाहीर करावे. सातारा जिल्ह्यातील लोकांना परिवर्तन हवे असून मला खात्री आहे 23 रोजी आपलाच विजय होणार आहे. त्यामुळे खा. उदयनराजेंना मी पाडणारच आहे, असा पुनरुच्चार महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान दिवसभर मिशीचा पीळ रहातो, पण कॉलर टाईट रहात नाही. मी मर्द आहे म्हणूनच मिशा पिळतो, असा टोला पाटील यांनी उदयनराजेंच्या कॉलरची खिल्ली उडवली. उदयनराजेंना नेमका विकास निधी कुठे खर्च केला याचे उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. पण तुमच्या व्यासपिठावर भाजप पदाधिकारी दिसतात. शिवसेना पदाधिकारी तुमच्या प्रचारात दिसत नाहीत. अनेक जण राष्ट्रवादीचा प्रचार करतात. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, शिवसेना आणि भाजपचे मनोमिलन घट्ट झाले आहे. जिल्ह्यातील कोणताही शिवसैनिक नाराज नाही. तो पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत. जिल्ह्यातील माथाडी कामगार पूर्णपणे पाठीशी आहे. मी पैसेवाला उमेदवार नाही. मला कुणाच्या निधीची गरज नाही. जिल्ह्यातील जनता विद्यमान खासदारांना वैतागली आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत किती ओस पडली आहे. सोना आईलाज कंपनीचे उदाहरण समोर आहे. माझा जाहीर नामा लवकरच प्रसिद्ध करणार आहे. जनतेला अपेक्षीत असणारे प्रश्न जाहीरनाम्यात घेतले आहेत. जनतेला अभिप्रेत असणारा आमचा जाहीरनामा असणार आहे. सातार्यात कितीही दोघा भावांनी पदयात्रा काढल्या तरी फरक पडणार नाही, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
मराठा समाजाचे राज्यात मोर्चे निघाले, किती मोर्चात ते सहभागी झाले होते.सातारा मतदारसंघातील जनतेला बदल हवा आहे. तो 23 तारखेला चमत्कार झालेला दिसेल. निकालानंतर पाच वर्षात विकास काय असतो ते मी दाखवून देणार आहे. मी करतो नंतर बोलतो, करून दाखवल्यावर मी त्यांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नांची उत्तरे देईन, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
उदयनराजे छत्रपतींचे तेरावे वंशज आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी राज्यातील सोडा जिल्ह्यातील किल्यांच्या डागडुजीकडे का दुर्लक्ष केले. प्रतापगडाचा बुरुज ढासळला आहे. बांधकाम ढासळले आहे तरी पण उदयनराजेंनी काय काही पावले उचलली नाहीत. उदयनराजे तुंम्ही फक्त 25 कोटींच्या निधीबाबत बोलू शकता उर्वरित निधी केंद्र व राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्याचा आपणास कसलाही अधिकार नाही. सातारा बसस्थानकालगत म्युझियम बांधून झाले मात्र ते अजून सुरु नाही. टोलचा झोल असून एक कराडचा आणि एक वाईचा यांच्याकडे टोलचे व्यवस्थापन आहे. त्यातील किती पैसा कुणाकडे जातो याची चंागली माहिती आम्हाला आहे. मतदारांनी संधी दिल्यास एम. एच. 11 आणि एम. एच. 50 पासिंगच्या वाहनांना जिल्ह्यात टोलमुक्त करु, अशी ग्वाही नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली.
उदयनराजे यांचे सातार्यात कुठे कार्यालय आहे ते सापडत नाही. नागरिकांना त्यांच्या राजवाड्यावर जावे लागते. त्याठिकाणी किती काळ वाट बघत बसावे लागत नाही हे सांगता येत नाही. कधी ऊस उत्पादकांची बाजू घेतल्याचे दिसत नाही. संसदेत एखादा प्रश्न मांडल्याचे दिसत नाही. सातार्यातील ऐतिहासिक राजवाड्यात अनेकदा चोर्या झाल्या. मौल्यवान वस्तू, साहित्य चोरीस गेले मात्र आपण साधी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही. राजे दु:ख व्यक्त करतात मग तक्रार का करत नाहीत? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.
सातारा नगरपालिका हा एक मोठा अड्डा असून कमी दर्जाचा माल कसा येतो? कोण कोण मलिदा खातो? याचे पोस्टमार्टम लवकरच करणार आहे. 4 ते 5 हजार शेतकर्यांच्या जमिनीवर भवानी माता ट्रस्टचे शिक्के आहेत त्याबाबत उदयनराजे यांनी खुलासा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक वित्तीय संस्था,मार्केटिंग कंपन्यांमध्ये घोटाळे झाले. यामध्ये करोडो रुपये लोकांचे अडकून पडले. या लोकांसाठी त्यांनी काय केले याचे उत्तर देणे गरजचे आहे. आम्ही या लोकांना आगामी काळात निश्चितच आधार देणार आहे. उदयनराजेंच्या मिल्ट्री पोलिसची खिल्ली उडवताना नरेंद्र पाटील म्हणाले, ते त्यांच्या कार्यकर्त्यांचेच फक्त संरक्षण करतात.
पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अॅड. भरत पाटील, हणमंत चवरे, दीपक पवार, विजय काटवटे, दत्ताजी थोरात, सिध्दी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादीचा एकही खासदार
निवडून येणार नाही: माधव भंडारी
गेल्या लोकसभा निवडणुकीत सेना – भाजपाला राज्यात 42 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस राष्ट्रवादीला केवळ 6 जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत त्यापेक्षा बेकार अवस्था दोन्ही काँग्रेसची होणार आहे. केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर राज्यातून महायुतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वेळेपेक्षा यावेळी युतीचे खासदार वाढणार आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 6 खासदार निवडूण आले होते. यावेळी एकही खासदार येणार नाही, असा दावा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत केला.
उदयनराजे उत्तर द्या, नाहीतर समोरासमोर चर्चेला या : नरेंद्र पाटील यांचे आव्हान
विकासकामे काय असतात हेच उदयनराजे यांना माहित नाही. गेल्या दहा वर्षात त्यांनी नेमका किती निधी आणला तो कुठे खर्च केला याची माहिती उदयनराजे यांनी द्यावी. लोकसभेत किती प्रश्न विचारले? किती चर्चांमध्ये सहभाग घेतला? सभागृहात आपली उपस्थिती काय होती?सातारकरांचे कुठले प्रश्न विचारले? किती तास चर्चेमध्ये सहभाग घेतला? केंद्रातील कुठल्या चर्चेत सहभाग घेतला असल्यास त्याची डॉक्युमेंट द्यावीत, जीएसटी, नोटाबंदीला संसदेतच विरोध का नाही केला? खासदार निधीचा नेमका वापर कुठे केला? निधीबाबतची आपण देत असलेली आकडेवारी फसवी आहे. एखादा चांगला हिशोबनीस ठेवावा. गेल्या दोन पंचवार्षिकच्या जाहीरनाम्यांची किती अंमलबजावणी झाली, किती वचने पाळली? आदी 23 प्रश्नांचा जणू भडीमारच नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे यांच्यावर केला आहे. उदयनराजे यांनी स्वत: या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे. उत्तरे देणार नसाल तर कधीही कुठेही समोरासमोर चर्चेसाठी या असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी यावेळी केले.
उदयनराजेंना मी पाडणारच : नरेंद्र पाटील
RELATED ARTICLES