वडूज : सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील रानमळा शिवारातील येरळा नदीवरील बंधार्याचा भराव फुटून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. वर्षभरात या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्याचबरोबर अद्याप सदर बंधार्याची दुरुस्तीही झाली नाही. त्यामुळे या बंधार्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करावी. तसेच तातडीने नुकसान भरपायी द्यावी या मागणीसाठी बाधित शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, सिध्देश्वर कुरोली येथील रानमळा शिवारातील बहुतांशी शेतकर्यांचे शेती हेच उपजिवीकेचे मुख्य साधन आहे. जून 2018 मध्ये झालेल्या मोठ्या पावसामुळे येरळा नदीपात्रास मोठा पूर आला होता. भवानी मंदिरानजीक असणार्या येरळा नदीवरील बंधार्याच्या दार्यात मोठमोठी झाडे अडकल्यामुळे पुराचे पाणी भराव तोडून आजूबाजूच्या शेतकर्यांच्या शिवारात घुसले. या पुरामुळे श्री. शिवलिंग बनसोडे, महादेव पोपट बनसोडे, संजय सावंता बनसोडे, किसन संजय बनसोडे, भानुदास नामदेव बनसोडे, वसंत शिवाजी बनसोडे, हणमंत शिवाजी बनसोडे, रघुनाथ गुलाबराव देशमुख, दादासाहेब पांडुरंग देशमुख, निवृत्ती जगन्नाथ बनसोडे, नामदेव जगन्नाथ बनसोडे आदी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकाचे नुकसान झाले. त्यावेळी गांवकामगार तलाठ्यांनी या नुकसानीचे पंचनामेही केले होते. मात्र आठ ते दहा महिन्याचा कालावधी उलटूनसुध्दा अद्याप वरील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपायी मिळाली नाही. याच पुरामुळे नुकसान झालेल्या दुसर्या बंधार्या नजीकच्या काही शेतकर्यांना नुकसान भरपायी मिळाल्याचे समजते. तरी आम्हास अद्याप नुकसान भरपायी दिली नाही. तसेच फुटलेल्या भरावाची दुरुस्तीही केली गेली नाही.
त्यामुळे आगामी काळात वळीवाचा मोठा पाऊस तसेच जुन, जुलै मध्ये होणार्या नियमित पावसाच्या पुरामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी पाठबंधारे विभागाने तातडीने वरील कामी कार्यवाही करावी अन्यथा संबंधित शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
येरळा नदीवरील रानमळा बंधार्याची दुरुस्ती व भरपाई कधी मिळणार?
RELATED ARTICLES