Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीएफआरपीप्रमाणे संपुर्ण रक्कम दिल्याबद्दल अजिंक्यतारा कारखान्याचा सत्कार

एफआरपीप्रमाणे संपुर्ण रक्कम दिल्याबद्दल अजिंक्यतारा कारखान्याचा सत्कार

सातारा : नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीनुसार होणारी सर्व रक्कम संबंधीत शेतकर्‍यांना अदा करणारा सातारा जिल्ह्यातील पहिला आणि एकमेक कारखाना म्हणून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने नावलौकिक मिळवला आहे. शेतकर्‍यांना एफआरपीची संपुर्ण रक्कम दिल्याबद्दल अजिंक्यतारा कारखान्याचे आभार मानून शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत आणि संचालक मंडळाचा सत्कार केला.
अजिंक्यातारा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या गळीत हंगामात एकूण 6 लाख 36 हजार 339 मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. गाळपास आलेल्या ऊसाला कारखान्याने शासन निर्धारीत एफआरपीनुसार प्रतीटन 2 हजार 815 रुपये दर दिला असून एफआरपीनुसार गाळपास आलेल्या ऊसाला 1 अब्ज 79 कोटी 12 लाख 96 हजार 275 रुपये एवढी रक्कम कारखान्याने संबंधीत शेतकर्‍यांना अदा केली आहे. गाळप झालेल्या ऊसाची एफआरपीनुसार होणारी संपुर्ण रक्कम शेतकर्‍यांना देणारा अजिंक्यतारा साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील पहिला आणि एकमेव कारखाना ठरला आहे. शेतकर्‍यांचे हित जोपासून एफआरपीनुसार संपुर्ण रक्कम अदा केली याबद्दल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, संघटनेच्या लोकराजा विभागाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भोसले (गुरुजी), संघटनेचे जावली तालुका प्रमुख मनोज सणस, सातारा तालुका प्रमुख आनंदा महापुरे, नाना पाटील ब्रिगेडचे एकनाथ जाधव, शशी कदम आदी मान्यवरांनी कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले तसेच कारखान्याचे मार्गदर्शन संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे, चेअरमन सावंत आणि संचालकांचा शाल, श्रीफळ आणि हार घालून सत्कार केला.
ऊसाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलनाची भुमिका शेतकरी संघटनांमार्फत घेतली जात असते. त्याचप्रमाणे एखाद्या कारखान्याने एफआरपीनुसार शेतकर्‍यांना देय असलेली संपुर्ण रक्कम वेळेत दिल्याबद्दल शेतकरी संघटनेकडून त्या कारखान्याचा सत्कार केला जातो, हे निश्‍चितच प्रेरणादायी आणि सत्कार्यासाठी आणखी बळ देणारे आहे.
आज शेतकरी संघटनेने अजिंक्यतारा कारखान्याचा सत्कार करुन संचालक मंडळाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यामुळे संचालक मंडळाची जबाबदारी निश्‍चितच वाढली आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या तत्वानुसार कारखान्याचे कामकाज सुरु असून यापुढेही शेतकरी हिताचे निर्णय घेवून अजिंक्यतारा कारखाना कार्यरत राहील, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शेतकरी संघटनेला यावेळी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular