कराड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीच्या वतीने प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन
कराड : विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणार्या शेतकर्यांना पुनर्वसन पॅकेज मिळावे व त्या पॅकेजमध्ये नेमके कोणते लाभ देणार, याची माहिती देण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणच्या अधिकार्यांची बैठक बोलवावी, या मागणीचे निवेदन कराड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीच्या वतीने प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कराड विमानतळ विस्तारवाढीत बाधित शेतकर्यांपैकी साठ टक्के प्रकल्पग्रस्तांना अद्याप ताबा नोटीसा मिळालेल्या नाहीत. त्या मिळाव्यात व जमिनीता ताबा घेण्यापूर्वी पुनर्वसन पॅकेजमधून बाधित शेतकर्यांना कोणकोणते लाभ मिळणार याबाबत माहिती मिळण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणच्या अधिकार्यांसोबत बाधित शेतकर्यांची बैठक बोलविण्यात यावी. ही बैठक घेतल्याशिवाय शेतजमिनी व घरे यांचा ताबा घेऊ नये. आम्हाला भूसंपादनाची रक्कम मान्य नाही. चालू बाजार भावाप्रमाणे बाधित शेतकर्यांना मोबदला मिळावा. गावठाण लगतच्या शेतजमिनीस बिगरशेतीच्या दराने मोबदला देण्यात यावा, आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.यावेळी शंभरहून अधिक बाधित शेतकरी उपस्थित होते. त्यांनी पुनर्वसन पॅकेजबाबत बाधित शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याशिवाय जमिनींचा ताबा घेतला जाऊ नये, अशी मागणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्यासह रफीक सुतार, जनार्दन पाटील, शामराव देशमुख, एकनाथ पाटील, प्रल्हाद पाटील, दिनकर पाटील, राजेंद्र शिंदे, बापुराव शिंदे, रमेश पाटील, राजेंद्र पाटील तसेच समितीचे पदाधिकारी व बाधित शेतकरी उपस्थित होते.
विमानतळ विस्तारीकरणास आमचा विरोध नाही मात्र भूसंपादनाचा लाभ चालू बाजारभावाप्रमाणे मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी सांगितले.
‘विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणार्या शेतकर्यांना पुनर्वसन पॅकेज मिळावे’
RELATED ARTICLES