सातारा : नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी खरीप हंगाम 2019 मध्ये पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवणेस शासनाने मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय ,महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्यानुसार भात, ख.ज्वारी, बाजरी, नाचणी, ख. भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग व ख. कांदा या पिकांसाठी ही योजना लागू असून या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 24 जूलै 2019 ही अंतिम मुदत आहे. शेतकर्यांनी फक्त 2 टक्के विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत संरक्षित रकमेची सांगड पिकाच्या आधारभूत किमतीशी घातल्याने संरक्षित रकमेत वाढ झाली आहे. परंतू विमा हप्ता दर 2 टक्के असल्याने विमा हप्त्याची रक्कम अल्प असून ती प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे आहे. भात ( 630 रु) ख.ज्वारी (300 रु) बाजरी (260 रु) नाचणी (300 रु) ख.भुईमूग (600 रु) सोयाबीन (500 रु) मूग (380 रु) उडीद (380 रु) ख.कांदा (1700 रु) कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना या योजनेत सहभागी होता येईल.
कर्जदार शेतकर्यांना योजना सक्तीची असल्याने त्यांचे कर्ज खात्यामधून विमा हप्त्याची रक्कम परस्पर विमा कंपनीस अदा होणार असून बिगर कर्जदार शेतकर्यांना ही योजना ऐच्छिक असल्याने त्यांनी ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा उतरावयाचा आहे. त्या शेताचा 7/12 उतारा (8 अ) घेऊन आपले ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बॅकेत खाते आहे. त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 7/12 उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पिक असल्याचे स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत गारपीट, भूस्स्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लोगणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर निश्चित करण्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी शेतकर्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकर्यांनी वित्तीय संस्थेस (बॅकेस ) अथवा विमा कंपनीस नुकसान झालेपासून 48 तासांचे आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. या योजनेतील संरक्षित बाबी पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पिके पेरणी पूर्वी / लावणीपूर्वी नुकसान भरपाई, हंगामामधील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक नुकसान इ.
अनिश्चित हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने तसेच पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थिीतही शेतकर्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम या योजनेद्वारे होत असल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन सुनिल बोरकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. 24 जुलै अंतिम मुदत
RELATED ARTICLES