तुषार माने(म्हासुर्णे प्रतिनिधी) :- म्हासुर्णे—दुर्ग संवर्धन करायचे म्हटले की दुर्ग अभ्यास महत्वाचा आणि दुर्ग अभ्यास करायचा म्हटलं की दुर्ग प्रेमी मावळे महत्वाचे. त्यामुळे १९ जून २०१९ रोजी झालेली किल्ले भूषणगड येथील मोहीम ही याच उद्दिष्टांवर आधारित होती असे म्हणण्यास हरकत नाही.
या मोहिमेत सकाळी साधारण १० वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमून दुर्ग पूजन केले गेले. गडावर पोहोचल्यावर देव दर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरवात झाली. सर्वात अदोगर स्वच्छता मोहीमेस प्रारंभ करून हरणाई देवी मंदिराशेजारील तलावातील आणि कडेला असणारी अनावश्यक झाडे झुडुपे काढण्यात आली. तसेच त्या तलावातील कागद ,प्लास्टिक, पत्रावळ तसेच इतर कचरा गोळा करण्यात आला. त्यासोबत टेहळणी बुरुजाकडील परिसर कचरा मुक्त करण्यात आला. अनावश्यक झाडे तोडून उपटून काढल्यानंतर त्यापासून पुन्हा फुटवे फुटू नयेत याकरता झाडांच्या मुळावर आणि न तोडलेल्या झाडाच्या बुंध्यावर रासायनिक पदार्थांचा प्रोयोग करण्यात आला .
त्यानंतर सर्व नवीन मावळ्यांना एकत्र बसवून दुर्ग संवर्धन तसेच त्याचे महत्व काय आहे हे समजावून सांगण्यात आले. दुर्ग संवर्धन हे एकट्या दुकट्याचे कार्य नसून ते सर्वांचे आहे, यात सर्वांचीच महत्वाची भूमिका आहे आणि हा ऐतिहासिक वारसा जपणे किती महत्वाचे आहे हे समजून सांगण्यात आले. आपल्या सर्वांवरच ही जबाबदारी आहे आणि ती कशी पार पाडावी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यात स्वतःचे योगदान जास्तीत जास्त कसे देतायेईल यासाठी प्रत्येक मावळ्यात नवीन उमेद जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला . त्यासाठी दुर्ग इतिहास व स्वराज्याची उद्दिष्टे यांचे स्पष्टीकरण करण्यात आले .
नंतर दुर्ग भ्रमंतीत गडाचे काय महत्व आहे हे स्पष्ट करण्यात आले आणि शेवटी प्रेरणा मंत्राच्या साहाय्याने सर्वांना हे कार्य अखंड चालू आणि स्वहस्ते करण्यास प्रेरित करून ही अभ्यासपूर्ण मोहीम पूर्णत्वास नेण्यात आली.