वाई : कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार सुरुवात केल्याने पेरणी योग्य वातावरण तयार झाले आहे. वाई, पाचगणी, महाबळेश्वर तालुक्यात ही चांगली पावसाने सुरुवात केली असून शेतातील पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात आल्या असून चांगला पाऊस पडल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात सध्या सर्वत्र पेरणीची धांदल सुरु असून बळीराजा मात्र शेतामध्ये पेरणीच्या कामात व्यस्त दिसत आहे.
पेरणीसाठी लागणारे बैल-जोडी मिळत नसल्याने ट्रॅक्टरला शेतकर्यांनी पसंती दिली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. बैल-जोडीचे दर प्रचंड वाढलेले असल्याने पारंपारिक पेरणी पेक्षा यांत्रिक पेरणीला महत्व आलेले आहे. बैल-जोडी सांभाळताना शेतकर्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्या इतिहास जमा होते-कि-काय असे विदारक चित्र दुर्दैवाने सर्वत्र दिसत आहे.
ज्या प्रमाणात पाऊस पडत आहे.तो फक्त पेरणी झालेल्या पिकांना उगवणीसाठी महत्वपूर्ण आहे.परंतु बंधारे, तलाव, धरण हे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पुरेसा पाऊस पडण्याची आज नितांत गरज आहे.काही भागात धूळवाफेवर पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी पिके उगवण्याची चिंता होती ती आता संपल्यात जमा आहे. खरीप हंगामात मुग, तूर, चवळी, सोयाबीन बाजरी, भुईमुग, हायब्रीड या पिकांची पेरणी करण्यात पूर्व भागातील शेतकरी मग्न आहे.तर पश्चिम भागात भाताची रोपे तयार करताना शेतकरी दिसत आहे. व त्यासाठी लागणारे उत्तम प्रकारचे खत व बियाणे खरेदीसाठी दुकानातून एकाच गर्दी उडाली आहे. शेतकरी शेतीकामात गुंग असल्याने बाजार पेठेतमात्र शुकशुकाट दिसत आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका सध्या वाई तालुक्यातील शेतकरी सोसत आहेत.पावसाने उशिरा सुरुवात केल्याने व वळीवाचा एकच पाऊस पडल्याने शेताच्या मशागती पूर्ण होण्यास विलंब लागला आहे. याचा फटका पिक उत्पादनावर होणार आहे.
पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने बळीराजाने मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करीत होता.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी शेतीच्या मशागती व पेरणीसाठी बँका, सोसायट्यांचे आर्थिक कर्ज घेतलेले आहे. यावर्षी पुन्हा एकदा हवामान खात्याचा अंदाज चुकला असल्याने शेतकर्यांना मात्र पावसाची वाट पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय उरला नाही. सध्या वाई तालुक्यात सर्वत्र पेरणीची धामधूम सुरु असून पंधरा दिवसातच पेरणी पूर्ण होवून बळीराजाला बेंदूर सणाचे वेद लागतील यात शंका नाही.
वाई तालुक्यात पेरणीमध्ये बळीराजा गुंग
RELATED ARTICLES