खंडाळा : खेड ता. खंडाळा परिसरातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत माजी आमदार मदन भोसले यांनी केलेल्या मागणीवर जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सर्व कागदी घोडे बाजुला सारले आणि धोम बलवकवडीच्या कालव्या खेडच्या तुळशीवृंदावन तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले. पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देणार्या खेड परिसरातील जनतेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
खेड ता. खंडाळा येथील तुळशीवृंदावन तलावात अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या तलावातील पाण्यावर खेड परिसरातील अनेक गावे अवलंबुन आहेत. या तलावातील पाण्यावरच मार्च महिन्यापर्यंत खेड परिसरातील गावांची पाण्याची गरज भागते. या तलावाच्या वरच्या बाजूने धोम-बलकवडी धरणाचा कालवा गेलेला आहे. धोम-बलकवडी धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असल्याने या कालव्यातील पाणी तुळशी वृंदावन तलावात सोडावे अशी मागणी खेड परिसरातील ग्रामस्थांनी मदन भोसले यांच्याकडे केली होती. याबाबत खेड ग्रामस्थांच्या असणार्या भावना लक्षात घेवून मदन भोसले यांनी तुळशीवृंदावन तलावात पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदनही मदन भोसले यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना देवू केले. मात्र गिरीश महाजन यांनी सर्व वस्तुस्थिती ऐकुन घेतल्यानंतर अशा महत्वपुर्ण प्रश्नासाठी निवेदन देण्याची आवश्यकता नाही, असे सांगून याबाबत आदेश देत असल्याचे सांगितले.
यावेळी मदन भोसले यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील, किसन वीर कारखान्याचे संचालक राहुल घाडगे, खंडाळा कारखान्याचे संचालक बापूराव धायगुडे,जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, खंडाळा तालुका भाजपा अध्यक्ष राहुल हाडके, लोणंद बाजार समितीचे संचालक राहुल नागर, खेडचे सरपंच सचिन धायगुडे, लोणंद खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बबनराव शेळके, अशोकराव धायगुडे, तेजस क्षीरसागर आदी उपस्थित होते.
तुळशीवृंदावन तलावात पाणी येणार मदन भोसले यांच्या मागणीवर ना. गिरीश महाजन यांचे आदेश
RELATED ARTICLES