पाटण- गेल्या महिन्यात 3 ऑगस्ट पासून कोयना परिसरासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणातून सोडलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे कोयना नदीकाठावरील पाटण, कराड, सांगली सह कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा हाहाकारा उडाला होता. या परस्थितीला महिना होत नाही तोपर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रासह पश्चिम घाटावर पावसाने पुन्हा तोंड उघडले असून कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे सकाळी आठ फुटावर उघडण्यात आले होते ते आज रात्री सडे नऊ वाजता १० फुटांवर करण्यात आले . कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद १ लाख ३ हजार २४८ क्युसेस असून नदीपात्रात ८९ हजार क्युसेस पाणी प्रतिसेकंद सोडण्यात येत आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता संपुष्टात आली असून पुन्हा कोयना नदीला पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना काठावरील नागरीकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाने देखील कोयना काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पुरपरस्थितीला धरण व्यवस्थापनाचा नियोजन शुन्य कारभार जबाबदार असून नागरीकांच्यात धरण व्यवस्थापशावर असंतोष निर्माण झाला आहे.
गेल्या महिन्यात पाऊसाच्या हाहाकाराने ३ औगस्ट पासून सुरु झालेली पुरपरस्थिती तब्बल आठ दिवस कायम राहिली होती. या पुरपरस्थितीत न भुतो.. न भविष्यती.. अशी परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीतून सामान्य जनता सावरत आसताना पुन्हा पुरपरस्थितीला सामोरे जाण्याची परस्थिती निर्माण होण्याची भीती नागरीकांच्यात झाली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार पावसाने सुरवात केल्याने शिवाजी सागर जलाशयात तब्बल १ लाख ३ हजार २४८ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या धरणात आजच्या घडीला १०४.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्याने ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्याच पटीत ते पाणी पुर्वेकडे सोडण्याशिवाय व्यवस्थापनाला पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे बुधवारी सकाळी ११ वाजता ८ फुटांनी वर उचलून त्यातून ७० हजार २९८ व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २ हजार १०० व त्यांनतर रात्री साडे नऊ वाजता वक्र दरवाजे 10 फुटांवर करून प्रतिसेकंद ८९ हजार क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान, सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा कोयना नदीच्या पाणीपातळीने मोठ्या प्रमाणात वाढ होवून अनेक ठिकाणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना नदीवरील मूळगाव पूल पाण्याखाली गेल्याने गावचा संपर्क तुटला आहे. तर नदीकाठच्या इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची प्रमाण असेच सुरू राहिल्यास धरणातून यापेक्षाही अधिक प्रमाणात पाणी सोडण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत असून महापूराची शक्यता व भिती निर्माण झाली आहे.
आताच्या पुरपरस्थितीला धरण व्यवस्थापन जबाबदार..
गेल्या महिन्यातील पुरपरस्थिती व पाऊसाचा अंदाज घेता पुढे महिनाभर पाऊसाचे दिवस बाकी असताना. कोयना धरणातील पाणी साठा ९० ते ९५ टि.एम.सी. वर स्थिर करण्यास हवा होता. राहीलेल्या महिनाभरात पाऊस कमी प्रमाणात पडला असता तरी ओक्टोंबर अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरते हा कोयना धरणाचा इतिहास आहे. जरी या काळात पाऊस वाढला तरी १० ते १५ टि.एम.सी. मधे पाणी नियंत्रित करता येते. असे असताना मात्र धरण व्यवस्थापनाने हा पाणी साठा १०४ टि.एम.सी. वर स्थिर करुन ठेवला होता. सद्या धरणातील साठवण क्षमता संपुष्टात आली आहे. पाऊसाने वाढलेली पाण्याची आवक शिल्लक ठेवलेल्या १ टि.एम.सी. त नियंत्रित करणे शक्य नाही. म्हणून या पुरपरस्थितीला महिनाभरात पुन्हा सामोरे जावे लागणार का.? अशी शक्यता निर्माण झाली आहे. धरण व्यवस्थापनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे पुन्हा पुरपरस्थिती निर्माण झालीय अशा संतप्त प्रतिक्रिया नागरीकांच्या येत आहेत.
कोयनानगर येथे 48 (6004), नवजा 101 (6783), महाबळेश्वर 52 (6077) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलपातळी 2163.1 फूट व 659.308 मीटर उंची झाली आहे. सध्या धरणात 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरणात 82 हजार 429 क्युसेक्स आवक होत असून 72 हजार 398 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग गेटमधून सुरू आहे. 1 जूनपासून आजपर्यंत कोयना धरणात 177.05 टीएमसी पाण्याची आवक झाली असून 71.50 टीएमसी पाणी विनावापर सोडून देण्यात आले आहे.