कर्ज काढून, जमीनी, सोने विकून हा व्यवसाय थाटलेले शेतकरी रस्त्यावर; दोषींवर कारवाई करण्याची मागणी
औंध : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायामध्ये खटाव तालुक्यातील शेतकर्यांना ही लाखो रुपयांचा चुना लागला असून इस्लामपूर येथील कंपनीच्या कार्यालय बंद झाल्याने दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली असून सुमारे 58 शेतकर्यांचे, पोल्ट्री फार्म धारकांचे लाखो रुपये यामध्ये अडकले आहेत. अनेकांनी कर्जे काढून, जमिनी, सोनेनाणे विकून हा व्यवसाय सुरू केला होता अशी धक्कादायक माहिती समोर येत असून पोलीस यंत्रणेने याच्या मुळाशी जाऊन हे प्रकरण धसास लावावे अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.दरम्यान यासर्व शेतकर्यांच्यावतीने लवकरच संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय हा मागील एक वर्षांपासून सांगली, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावला होता. कडकनाथ कोंबडी व अंडी ही आरोग्यासाठी चांगली, औषधी असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाल्याने या कडकनाथला सर्वत्र मोठी मागणी वाढली होती. ही गरज व नस ओळखून इस्लामपूर येथील महारयत अँग्रोने या व्यवसायाचे मोठे मार्केटिंग केले व त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटणसह दुष्काळी खटाव तालुक्यातील शेतकरी ही मोठया प्रमाणात या कडकनाथ पोल्ट्रीफार्म व्यवसायाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.
यामध्ये जायगाव, कोकराळे, औंध, रहाटणी, वडगाव (ज.स्वा.), लांडेवाडी, चोराडे, पुसेसावळी, पुसेगाव तसेच अन्य भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. प्रथमदर्शनी हा आकडा साठ पर्यंत जात असून अनेक शेतकर्यांनी, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आपली शेते विकून, गहाण ठेऊन तसेच सोने नाणे विकून, बँका, पतसंस्थांंची कर्जे काढून, बचत केलेली जमापुंजी मोडून मोठ्या प्रमाणात शेड, पक्षी यासाठी शेतकर्यांनी पैसे गुंतवले होते मात्र एवढे सर्व करून ही पक्षी, अंडयांना बाजारात कोणत्याही प्रकारची मागणी नसल्याने व इस्लामपूर येथील कंपनीने गाशा गुंडाळून शेतकर्यांचे पैसे लाटल्याने संबंधित गुंतवणूकदारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत कंपनीवर तसेच जबाबदार पदाधिकार्यावर गुन्हे दाखल करून शेतकर्यांची झालेली नुकसान भरपाई परत मिळावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या कडे केली आहे अशी माहिती नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारक सुनील सुर्यवंशी यांनी दिली. यावेळी शुभम नाईक,विशाल रोमण,ओंकार सावंत,गोरख जगताप, नितीन भोसले, गुरूदत्त घार्गे, महेश पिसाळ, गणेश चव्हाण, महेंश भोसले, सुरेश पिसाळ आदी नुकसानग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते.
कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात खटाव तालुक्यातील पोल्ट्रीधारक शेतकर्यांना लाखोंचा चुना
RELATED ARTICLES