पाटण :- आ. देसाई तुम्ही पाटण शुगरकेन प्रकल्पाची अजीबात काळजी करू नका तो उभा करून पाटण मतदारसंघातील शेतकरऱ्यांना सर्वाधिक दर व त्यांच्याच मुलांसाठी रोजगार व व्यवसाय निर्मिती करण्याची माझ्यात हिम्मत आहे. तुम्हाला या प्रकल्पाबाबत प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही कारण तुम्ही याचे सभासदही नाही. पण प्रकल्पाच्या कामाची तुम्हाला जास्तच काळजी असेल तर तुम्ही वेळ सांगा त्यावेळी तेथे मी माझी गाडी पाठवतो त्यात बसून या व प्रत्यक्ष जागेवर काय काम सुरू आहे व याची आलेली मशीनरीही डोळे भरून बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या साखर कारखान्यातच नव्हे तर सर्वच स्तरावर किती निष्क्रिय आहात याची पावतीच मिळेल. आता तुम्हीच सांगा कधी गाडी पाठवू ? असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी मुबंई येथे झालेल्या मेळाव्यात केले.
यावेळी मुबंई महानगरपालीकेचे माजी उपायुक्त विजयसिंह पाटणकर, अधिकशेठ पवार, महेंद्र मगरे,अशोक देेेसाई,उत्तमराव सुपुगडे, राजेश पवार, राजाभाऊ शेलार, सदाभाऊ जाधव आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
सत्यजीतसिंह पाटणकर पुढे म्हणाले लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने सन २०२८ – १९ सालातील ज्या शेतकऱ्यांना त्यांना ऊस घातला त्यांच्याच एफ. आर. पी. चे सुमारे दोन कोटी ३४ लाख रूपये थकवले . अनेकदा शेतकरऱ्यांनी मागणी करूनही हे पैसे दिले जात नव्हते. शेवटी सहकार खात्याने जप्तीचा बडगा दाखवला तर दुसरीकडे यासाठी आम्हीही जनरेटा उभारला यामुळेच अवघ्या चारच दिवसांत त्यांना हे पैसे बँकेत जमा केल्याचे सांगावे लागले यातच यांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला. जर यांच्याकडे एफ. आर. पी. चा थकीत पैसा द्यायला नव्हता तर मग तो अवघ्या चार दिवसात नक्की कोठून आला ? हा शेतकरयांच्या घामाचा पैसा यांनी नक्की कोणाच्या नावावर ठेवला होता ? त्याचे व्याज अद्यापही या शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.
निवडणुकीच्या तोंडावर जर हा पैसा दिला नाही तर मग याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील या भितीतूनच हा पैसा तात्काळ बाहेर आला अन्यथा त्याचे काय झाले असते ? याबाबत मी विचारलेल्या प्रश्नांमुळे आ. देसाई यांना मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी माझ्यावरच आरोप केले. परंतु मी देसाई कारखान्याचा सभासद असल्याने तम्हाला प्रश्न विचारण्याचा मला कायदेशीर अधिकार आहे त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. आणि तो अधिकार मी नेहमीच बजावत रहाणार. ज्या शेतकरयांचे एफ. आर. पी. थकीत रक्कमांचे व्याज,कामगारांचे थकीत पगार, देणी याबाबतही सातत्याने पाठपुरावा करून तो पैसा तुमच्याकडून वसूल करून तो संबंधितांना मिळवून मी देणारच.
स्वतःला कार्यसम्राट म्हणवून घेणारे आ. देसाई माझ्या कारखान्याची एक वीटही बसली नाही असा आरोप करतात. अहो महाशय माझ्या किती प्रकल्पाच्या मी वीटा बसवून ते प्रकल्प यशस्वी केले यातून हजारोंच्या संसाराच्या वीटाही रचल्या. माझ्या साखर कारखान्याची ऐंशी टक्के मशीनरीही आली कामही सुरू आहे. याउलट तुमच्या ताब्यातील एकमेव कारखान्याची पहीली विट माझ्या व तुमच्या वाडवडीलांनी लावली. तुम्ही एखादा प्रकल्प तर सोडाच पण स्वतःच्या कर्तृत्वावर घराची वीट तरी रचली का ? वीट तर सोडाच पण वडीलांच्या नावाने काढलेले स्व. शिवाजीराव देसाई मेमोरियल हाॅस्पिटलच्या खाॅटाही गायब करणारा तुमचा पराक्रम आणि शिवशंभू दुध संघ, शिवतेज बझार कोठे बुडवला हे आधी जाहीर सांगा आणि मगच माझ्यावर आरोप करा .
राहीला प्रश्न माझ्या नवीन साखर कारखान्याचा तर येथे तुम्ही साधे सभासदही नाही त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. आपल्या वाडवडीलांनी सुरू केलेला साखर कारखाना तुम्हाला नीट चालवला येत नाही. तो मोडकळीस आणला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याच पैशासाठी सहकार खात्याला जप्तीचे आदेश देण्याची वेळ आणली. तुम्ही जाहीर केलेला एकतरी प्रकल्प निदान उभा केला असता किंवा सुरू प्रकल्प बंद पाडले नसते तर कदाचित तुम्हाला मला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राहीला असता पण तोही तुम्ही गमावला आहे. पण तरीही तुम्ही घाबरून जाऊ नका माझ्या कारखान्याची तुम्हाला जास्तच काळजी असेल तर मग तुम्ही सांगाल त्यावेळी मी माझी गाडी पाठवतो त्यानंतर तुम्हाला प्रकल्पस्थळी सुरू असलेले काम कारखान्याची ऐंशी टक्के पेक्षाही जास्त आलेली मशीनरीही दाखवतो. आणि जर तुम्हाला अधिकच वेळ असला तर चांगले प्रकल्प कसे चालवायचे असतात याचा नमुना म्हणून माझे इतरही प्रकल्प दाखवितो तेव्हा हिम्मत असेल तर तुम्ही आता वेळ सांगा असेही शेवटी सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले.