सत्यजीतसिंहांना आमदार तर मला खासदार करा
पाटण : लोकसभा महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यांपुर्वी आघाडीतून निवडणूक जिंकली व ते खासदारही झाले. अवघ्या तीन महिन्यात नक्की असं काय झालं की त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा देवून आपल्यावर पुन्हा ही निवडणूक लादली याचे सर्वांनाच पटेल असे कारण त्यांनी सांगावे मी निवडणुकीतून माघार घेईन असे खुले आव्हान महाआघाडीचे लोकसभा उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी केले. पाटण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा केवळ पाटणकरांचे सकारात्मक विचारच करू शकतात. त्यामुळे राज्य नव्हे तर देशपातळीवरील विकासाचे धोरण येथेही राबवायचे असल्याने लोकसभेसाठी मला व विधानसभासाठी सत्यजीतसिंह पाटणकर यांना मत म्हणजे विकासाला व आपले नेते खा. शरद पवार यांना मत हा विचार करूनच मतदानातून सकारात्मक परिवर्तन घडवा असे आवाहनही श्रीनिवास पाटील यांनी केले.
म्हावशी, ता. पाटण येथे महाआघाडीच्या श्रीनिवास पाटील व सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादी माहीती तंत्रज्ञान विभागाचे राज्य प्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, अर्जुनसिंह पाटणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले आजवर पाटण मतदारसंघात झालेला विकास हा विक्रमसिंह पाटणकर यांच्या दूरदृष्टीतून झाला आहे पवनचक्क्या, पर्यटन व्यवसाय अनेक प्रकल्प, संस्था, उद्योग हे याच विकासात्मक दूरदृष्टीचा परिपाक आहे. आता तोच वारसा सत्यजीतसिंह पाटणकर पुढे नेत असल्याने येणार्या निवडणुकीत त्यांना आमदार व मला खासदार करून तुम्ही गेल्या काही वर्षांत खुंटलेला विकास मार्गी लावून घ्या.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले सध्याच्या राज्य व केंद्र शासनाने केवळ जाहीरातीच्या जोरावर सर्वांनाच उध्वस्त केले आहे. टी. व्ही. चे बटण दाबलेकी लगेच मोदीबाबा हजरच. कोणालाही ही मंडळी न्याय देवू शकली नाही. त्यामुळे आता तुमच्या जीवनात स्थैर्य, आर्थिक, सामाजिक प्रगती, रोजगार व व्यवसायाची निर्मिती करून घ्यायची असेल तर आता येथे परिवर्तनाशिवाय पर्यायच उरलेला नाही. चांद्रयान, पुलवामा, देशभक्ती या बाबींवर आता निवडणुका होवू लागल्याने आपले मुळ प्रश्न बाजूला पडत आहेत. याचा मतदारांनी विचार करून आपल्या जीवनाशी निगडित प्रश्नांचा विचार करून मतदान करा. येथे आपला सर्वांगीण विकास साधून घ्यायचा असेल तर सन 1999 ची पुनरावृत्ती करून श्रीनिवास पाटील यांना खासदार व सत्यजीतसिंहांना आमदार करा.
सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले म्हावशी या गावातूनच 1983 साली परिवर्तनाची मशाल पेटली होती 2019 लाही याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय रहाणार नाही. विरोधक गेल्या पाच वर्षांत काय केलं हे सांगण्यापेक्षा दादांनी काय केले असा प्रश्न विचारतात. जर दादांनी काय केले नसते तर त्यांना या जनतेने तब्बल सहा वेळा आमदार केले नसते. आता या अपयशी आमदारांना घरी बसवा. येथे आपला नवीन साखर कारखाना होतोय असे अनेक नवनवीन प्रकल्प येथे उभारायचे आहेत. नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारूण हजारोंच्या हाताला काम द्यायचे आहे. याशिवाय मागील पाच वर्षांत रखडलेला मुलभूत विकास साधायचा आहे. यासाठी आता लोकसभेला श्रीनिवास पाटील व विधानसभेला मी असे कार्य करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. स्वागत सरपंच शंकर घाडगे, प्रास्तविक पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन दिपक घाडगे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, पंचायत समिती सदस्य सौ. उज्ज्वला लोहार, पाटणचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, दिपकसिंह पाटणकर, तालुका दुध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सरचिटणीस सुभाषराव पवार आदी मान्यवर महाआघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
राजेंनी राजीनाम्याचे पटण्यासारखे कारण दिल्यास माझी माघार : श्रीनिवास पाटील
RELATED ARTICLES