गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
कराड : काँग्रेसकडे कित्येक वर्ष सत्ता असूनही त्यांना विकास करता आला नाही .आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे गेले कित्येक वर्षे सत्ता, पदे उपभोगलेल्यानी आता माझी ही शेवटची निवडणूक आहे, माझी रिटायरमेंट आहे, असे म्हणायला सुरुवात केली आहे, मात्र जनता त्यांना थारा देणार नाही, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात युवा संवाद मेळाव्याअंतर्गत कॉफी ऊइथ युथ या मोहिमेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, कराड दक्षिण मतदार संघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन पाठक, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, प्रताप घोरपडे, उमेश शिंदे, संग्राम बर्गे, समृद्धी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे म्हणाले, काँग्रेसकडे गेली पन्नास-साठ वर्षे सत्ता होती. त्यांनी या कालावधीत काय विकास साधला हे त्यांना सांगता येणार नाही, मात्र नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात लोककल्याणकारी योजना राबवून देश प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. त्यामुळे देशात भाजपला मोठे यश आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप व मित्रपक्षांना मोठे यश मिळणार आहे. त्यामुळे विकासाच्या बरोबर राहून भाजपला साथ द्या,असे आवाहन त्यांनी केले.
पूर्वी मी आता शेवटची निवडणूक लढवत आहे, माझी आता रिटायरमेंट आहे, असे म्हणून काँग्रेसवाल्यांच्या भूलथापांना जनता बळी पडत होती, मात्र आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडत नाही. त्यामुळे जर कोणी मी शेवटची निवडणूक लडतोय, मला साथ द्या असे म्हणत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमीच योग्य भूमिका घेतली आहे त्यामुळे जनसामान्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. युवकांची साथ त्यांना लाभली आहे त्यामुळे ते पुन्हा लोकसभेत जातील यात तिळमात्र शंका वाटत नाही. त्याच प्रमाणे डॉ. अतुल भोसले हे युवा नेतृत्व असून त्यांनी कराड मतदारसंघात केलेली विकास कामे, शैक्षणिक कार्य पाहून आणि त्यांना जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून तेही मोठा मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन विधानसभेत जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उदयनराजे भोसले व्यासपीठावर असताना मला बोलण्याची पहिल्यांदा संधी मिळाली असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी आवर्जून सांगितले.
देशात पाच वर्षात झालेली विकासकामे पाहून जनता खुश असली तरी सत्तेपासून दूर राहावे लागत असल्याने विरोधकांचा तिळपापड होत आहे, मात्र आता त्यांना विरोधातच बसावे लागणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वराज्याचे स्वराज्य करण्याचे काम केले, त्यामुळे जनताही विकास बरोबरच राहणार आहे. ज्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, खासदारकी, राज्यपाल पद अशी पदे भूषवली त्यांनी कराड शहर, कराड तालुक्याच्या विकासासाठी काय केले असा प्रश्नही डॉ. सावंत यांनी उपस्थित केला. राज्यात भाजप पक्षाची पुन्हा सत्ता येईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उदयनराजे भोसले म्हणाले, ज्यांनी गेली कित्येक वर्ष सत्ता, पदे भोगली मात्र त्यांना जिल्ह्याचा विकास करता आला नाही.त्यामुळे पूर्ण पिढीचे नुकसान झाले. मुख्यमंत्रीपद असताना निदान एखादा औद्योगिक प्रकल्प तरी कराडमध्ये आणण्याची गरज होती मात्र केवळ सत्ता आणि राजकारण या पलीकडे त्यांनी काहीच केले नाही. ज्यांच्याकडे दोन टर्म खासदारकी, राज्यपाल पद होते अश्या लोकांनी उमेदीत विकास कामे केली नाहीत ते आता काय करणार, अशी टीकाही उदयनराजे यांनी यावेळी केली.आजचा युवक उद्याचा भविष्यकाळ असून युवकांना पाठबळ देण्यासाठी, त्यांच्या रोजगारनिर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे.युवक जोपर्यंत भरारी घेत नाहीत तोपर्यंत कायापालट होणार नाही, त्यामुळे मी पद, सत्ता याला कधीही किंमत देत नाही. केवळ सर्वसामान्यांचे हित बघून माझे काम सुरू असते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला साथ देत मला आणि अतुल भोसले यांना विजय करा, असे आवाहन त्यांनी केले.
अतुलबाबा भोसले म्हणाले, ज्या झपाट्याने कराड शहराचा, तालुक्याचा विकास होणे अपेक्षित होते त्या पद्धतीने झाला नाही. कराड एमआयडीसीत नवीन उद्योगधंदे आले नाहीत.सर्वोच्च पदावर राहूनही स्वतःच्या मतदारसंघाचा तालुक्याचा त्यांना विकास करता आला नाही.त्यामुळे युवकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड चीड आहे. केवळ निवडणुकीपुरते येऊन, माझी शेवटची निवडणूक आहे म्हणणार्यांना जनता कदापि मदत करणार नाही.उलट कायम लोकांमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरत प्रयत्न करणार्या उदयनराजे भोसले यांना जनता साथ देणार आहे. उदयनराजेंनी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, आयआयटीसाठी पुढाकार घेतला आहे.आजचा युवक मजबूत झाला पाहिजे, यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आम्हाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप देशात, राज्यात मजबूत बनला आहे. त्यामुळे एकदा संधी द्या स्वर्गीय चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा विकास करू, अशी अभिवचन अतुल भोसले यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक रोहिणी शिंदे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या युवा संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने युवक, युवती उपस्थित होत्या.
माझी रिटायर्टमेंट आहे म्हणून निवडून द्या म्हणण्याची वेळ आता संपली
RELATED ARTICLES