कोरेगाव : शहराबरोबर ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण असलेल्या कोरेगाव-एकंबे रस्त्याची दुरवस्था झाली असून, नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत, या रस्त्याची 8 दिवसांमध्ये दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक महेश बर्गे यांनी दिला आहे. बर्गे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलली असून, शाखा अभियंता एम. जी. पठाण यांनी पाहणी केली. लवकरात लवकरत दुरुस्तीचे काम सुरु करण्याची ग्वाही दिली.
कोरेगाव शहराचा पुर्वेच्या बाजूस मोठा विस्तार झाला असून, अनेक नागरी वसाहतींची उभारणी झाली आहे. गोळेवाडी, सायगाव (पुनर्वसीत), एकंबे, वाघजाईवाडी, जायगाव या गावांसाठी हा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काही वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, नाममात्र डागडुजी करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात होती. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन नगरसेवक महेश बर्गे यांनी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपअभियंता राजेंद्र कुंभार यांनी तात्काळ दखल घेत शाखा अभियंता एम. जी. पठाण यांना रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. पठाण यांनी महेश बर्गे यांच्यासमवेत एकंबे नाका ते बागलकोट पर्यंत रस्त्याची पाहणी करुन नागरिकांकडून माहिती घेतली. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रस्ता करा, पण त्यावर मातीची ढेकळं नको….
कोरेगाव- एकंबे रस्ता हा महत्वाचा असून, या रस्त्याबाबत पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाचे अभियंते म्हणावे असे लक्ष देत नाही. केवळ ठराविक जणांचे हित जोपासत नव्याने रस्ता तयार करणे अथवा रस्ता दुरुस्तीबाबत अट्टाहासाने वागत आहेत. अनेक वर्षे चर्चेत राहिलेल्या या रस्त्याबाबत नागरिक आक्रमक असताना देखील पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाचे अभियंते निद्रावस्थेत होते. आता नागरिक आक्रमक झाले असून, कोणत्याही परिस्थितीत शांत बसणार नाहीत, त्यांना रस्ता हवा आहे, पण त्यावर मातीचे ढेकळं नको आहेत. नागरिकांच्या मागणीचा गार्ंभीयाने विचार न केल्यास पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक महेश बर्गे यांनी दिला आहे.
एकंबे रस्त्याची आठ दिवसात दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलन
RELATED ARTICLES