* कामे निकृष्ट झाल्याची नगरसेवकांची तक्रार * भुयारीचे काम पुन्हा सोमवारपासून सुरू *
सातारा: सातारा शहराच्या पश्चिम भागातून सुरू झालेल्या 105 कोटीच्या भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाला. शुक्रवारी सकाळी नगराध्यक्षाच्या दालनात झालेल्या बैठकीत ठेकेदार कंपनीचे संचालक आर. एस. पटेल व मुख्य अभियंता एस. एस. अग्रवाल यांच्यासह, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, बांधकाम सभापती सविता फाळके, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, नगर विकास आघाडीचे अशोक मोने, अमोल मोहिते तसेच बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते. भुयारी गटार योजनेचे चिमणपुरा, रामाचा गोट, बुधवार नाका, भोसले मळा करंजे या भागात अवघे पंचवीस टक्के काम झाले आहे.
केवळ अडीच फूट जमिनीत घालण्यात आलेले पाईप, दोन बाय तीन चे चेंबर बनवताना वापरण्यात आलेले निकृष्ट साहित्य, बीबीएम न करताच केवळ मातीवरच बनवण्यात आलेली चेंबर, सांडपाण्याच्या वहनाचा अंदाज न घेता सात इंच व्यासाचे बसवण्यात आलेले प्लॅस्टिकचे पाईप, त्यामुळे पावसाळ्यात तुंबलेले चेंबर या तक्रारींचा पाढाच नगरसेवक वसंत लेवे यांनी वाचला.
चिमणपुरा पेठेत बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र भुयारी गटार योजनेचे काम करताना अनियंत्रित रस्ते उकरण्यात आले. बर्याच ठिकाणी रस्त्यांचा समतल पणा गेल्याने वॉर्डात अपघाताचे प्रमाण वाढल्याची तक्रार लेवे यांनी केली.
भुयारी गटार योजनेचे काम हे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अजेंडयावरील महत्वपूर्ण विकास योजना आहे. या योजनेचे काम हे गुणवत्तापूर्ण झालेच पाहिजे असा आग्रह नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी धरला. पटेल यांनी सर्व कामे दर्जेदार तत्काळ करून दिली जातील, कामाच्या आराखड्याचे व्यवस्थापन तांत्रिक मंजूरी, आणि कामात येणार्या अडचणी त्यांनी विषद केल्या. या योजनेचे गेल्या चौदा महिन्यात केवळ वीस टक्केच काम झाले आहे.
संबधित वॉर्डचा नगरसेवक, पालिका बांधकाम विभाग, ठेकेदार कंपनीचे तज्ञ आणि कामगार यांच्या समन्वयाने कामाचा आराखडा समोर ठेऊन भू अंर्तगत पाईपलाईन व चेंबरचे काम करण्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले. संपूर्ण कामावर देखरेख ठेवण्याची जवाबदारी विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी स्वीकारली.
मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या विनापरवाना सभात्यागावर दोन्ही नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सांगितले.
जैवविविधता समितीच्या कार्यकारी मंडळाच्या रचनेची तातडीची निकड पालिकेला नसल्याचे दिसून आले. साविआ, नविआ, भाजप या तिन्ही आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्यांची नावे नगराध्यक्षांकडे सायंकाळी पाच वाजेपर्यंत दयायची होती. मात्र कोणत्याच आघाडीने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.
भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारासमोर तक्रारीचा पाढा
RELATED ARTICLES