पाटण : म्हावशी जिल्हा परिषद गट हा पाटणकर गटाचा व विचारांचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत भलेही चाफळ पंचायत समिती गणामध्ये अपेक्षित मते मिळाली नाहीत परंतु तरीही आपण सर्वांनी मिळून येणार्या काळात या दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये अपेक्षित विकास साधणे हेच आपले ध्येय आहे. जय पराजय याहीपेक्षा आपल्यावर विश्वास ठेवणारी जनता आणि त्यांच्या सुख दुखाःत आपण सातत्याने सहभागी होणे हेच आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी केले.
चाफळ विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या आभार दौर्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, शिवाजीराव पाटील, संभाजी सुर्ले, अशोक शिलवंत, सौ. सुलक्षणा धर, चंद्रकांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सत्यजीतसिंह पाटणकर पुढे म्हणाले आजपर्यंत हा मतदारसंघ सार्वत्रिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आणि निश्चितच त्यात आपण यशस्वीही झालो. चाफळचे राम मंदीर, पर्यटन विकास, ग्रामीण विकास, डोंगरपठारांवर पवनचक्क्या आदी सार्वत्रिक विकास आपल्या माध्यमातून झाला. याउलट विरोधकांनी विकासाऐवजी आपल्या प्रामाणिक मतदारांमध्ये बुद्धीभेद, आश्वासने, भूलथापा देवून अनपेक्षित मते मिळवली. निश्चितच यापुढच्या काळात आपल्याला पहिल्यांदा आपापल्यामधील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकत्रीत येवून बेरजेचे राजकारण करायचे आहे. हे करताना सार्वजनिक व वैयक्तिक कामांना प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि या सकारात्मक बाबींवरच येणार्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला बहुमताने विजय मिळवायचा आहे. त्यामुळे मी यानंतरही पुर्वीप्रमाणेच तुमच्या पाठीशी राहीन आणि तुम्हीही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहनही सत्यजीतसिंह पाटणकर यांनी केले.
यावेळी मारूती साळुंखे, देशमुख सर, वसंतराव जाधव, डी. एम. सुतार, डॉ. बाबर, साहेबराव पाटील आदी मान्यवर राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस मित्र पक्ष महाआघाडी, श्रमिक मुक्ती दलाचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.
जय पराजयापेक्षा जनहित महत्वाचे : सत्यजीतसिंह पाटणकर
RELATED ARTICLES