पाटण:- संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्या पासून भारतात व महाराष्ट्रात लौकडाऊन चालू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई – पुण्यासारख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. सुरक्षतेच्या कारणास्तव मोठ्या शहरातील लोक गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. गावाकडे येताना शासनाने काही अटी – शर्तीचे निर्बंध घातले आहेत. या निर्बंधाचे उल्लंघन व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन घाणबी ता. पाटण येथील २१ लोकांनी विनापरवाना ट्रव्हल्स व अन्य वाहनाने मुंबई वरून गावी घाणबी येथे पलायन करून आल्याचे कोरोना कमिटी सदस्यांना गस्त घालताना आढळून आले. या सर्वांच्यावर कोरोना संसर्ग व प्राद्रुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पाटण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या लोकांना घेऊन येणाऱ्या वाहणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी वनकुसवडे पठारावरील घाणबी ता. पाटण या गावामध्ये मुंबई मालाड पूर्व, वडाळा, भायखळा, गोरेगाव पश्चिम, सांगली, रत्नागिरी, चिपळूण आणि पोफळी येथून अज्ञात वाहाणाने २१ जण विनापरवाना दाखल झाले आहेत. रविवार दि. १७ रोजी घाणबी येथील कोरोना कमिटीच्या सदस्यांनी गावातून गस्त घालत आसताना २१ जण विनापरवाना गावात दाखल झाल्याचे त्यांना आढळून आले. याबाबतची माहिती गाव कमिटीने तात्काळ आरोग्य विभाग व पोलीस स्टेशन दिली. आरोग्य विभागाने घाणबी येथे जाऊन गावात आलेल्या सर्व २१ जणांना प्राथमिक शाळेत कोरोणटांईन केले आहे. याबाबत ची तक्रार घाणबी कोरोना कमिटीचे अध्यक्ष , सरपंच सौ. छाया रमेश शेळके यांनी पाटण पोलीस स्टेशनला दिली. या प्रकरणी २१ जणांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन व स्वतःच्या व समाजातील इतर लोकांच्या जिवीताला गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (बी), महा. कोवीड – १९ उपाययोजना २०२० कलम ११ अन्वये, कलम – १८८, २६९, २७०, २९० गुन्हा दाखल झाला आहे.