पाटण:- पुणे पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी पाटण तालुक्यातील गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. तर त्याच्या आधी काही दिवस ते वास्तव्यास होते. असे उघडकीस आले आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांचीही पुणे पोलिसांनी चौकशी चालवली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण बरोबर कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दहशतवाद्यांचे कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. अशी माहिती पथकातील सुत्रांनी दिली.
जिथे जिथे बॉम्बस्फोटाची चाचणी झाली त्या घटनास्थळाची पुणे एटीएसच्या पथकाने तपासणी सुरु केली आहे. त्याठिकाणी काही महत्त्वाचे धागेदोरे या पथकाच्या हाती लागतील असा संशय आहे. मात्र, या कारवाईबाबत एटीएसच्या अधिकार्यांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. या बाबत पाटण पोलिसांना संपर्क साधला असता एटीएस पथकाने आमच्याशी संपर्क साधला नाही असे सांगितले. हे दहशतवादी तब्बल चार दिवस पाटण तालुक्यात वास्तव्यास होते. त्यांना कोणी आश्रय दिला याचीही कसून तपासणी होत आहे.
पुणे-कोथरुड पोलिस स्थानकाचे कर्मचारी प्रदीप चव्हाण, अमोल नाझ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमिर अब्दुल हमिद खान व मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी अशा दोघांना मोटारसायकल चोरीच्या संशयातून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत हे दोघेही इसिस संघटनेचे दहशतवादी असल्याचे समोर आले. मोहम्मद आलम हा त्यांचा तिसरा साथीदार असून तो पसार आहे. दरम्यान, या दोन्ही दहशतवाद्यांनी आपण सातारा जिल्ह्यातील पाटणच्या जंगलात, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची कबुली दिली आहे.
मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमिर अब्दुल हमिद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी व मोहम्मद आलम हे तिघेही बॉम्बस्फोटाच्या चाचणीसाठी पुण्यातून साताऱ्यात व पुढे पाटणला आले होते. पाटण तालुक्यातील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केली. असे एटीएस च्या तपासात उघड झाले आहे. व काही दिवस त्यांनी पुणे ते कोल्हापूर-निपाणी-आजरामार्गे आंबोली असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान ते काही दिवस निपाणी व संकेश्वर येथे वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतही एटीएसच्या पथकाने वरील ठिकाणी या दहशतवाद्यांना आश्रय देणार्या व्यक्तींची चौकशी केली. तसेच दहशतवाद्यांच्या पुणे, सातारा, कोल्हापूर ते आंबोली दरम्यानच्या प्रवासाचे ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एटीएसचे कर्मचारी गोळा करत आहेत.
मंगळवारी (२५ जुलै) पुणे एटीएसचे पथक या दोघांनाही घेऊन आंबोलीच्या जंगलात आले होते. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले त्या जागेची पथकाने पाहणी केली. स्फोट केलेल्या जागेवरील माती परिक्षणासाठी घेतली. दरम्यान, त्या ठिकाणी अन्य काही साहित्य या पथकाला मिळाल्याचे समजते. दरम्यान, गुरुवार २७ जुलै रोजी पुणे एटीएसने अब्दुल कादीर दस्तगीर पठाण या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय एटीएसच्या अधिकार्यांना आहे.