पालिका स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा एकाकी नारा
सातारा : जिल्ह्यातील नगर पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या काँग्रेस पदाधिकार्यांना आज जाग आली. मोडकळीला आलेल्या काँग्रेस भवनात निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी मुठभर पदधिकार्यांसोबत बैठक घेण्यात आली.
त्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला. राष्ट्रवादीवर दबाव टाकून सत्तेत जाण्यासाठी स्वबळाची भुमिका घेत जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार सांगलीतून देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. पालिका व नगरपालिकांसाठी दि. 24 आक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा श्रीगणेशा होत आहे. पहाट झाली की,कोंबडा आरवतो…तशी निवडणुका जाहिर झाल्या की, कुंभकर्णी झोपेत असलेल्या काँग्रेस पदाधिकार्यांना जाग येते. आज येथील काँग्रेस भवनात पक्षातील पदाधिकार्यांसह बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, पक्ष निरिक्षक अजय छाजेड, संजय शिंदे, तौफिक मुलाणी, कार्याध्यक्ष विजयराव कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत सर्वांनीच राष्ट्रवादीकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा सूर ओढत आत्तापर्यंत काँग्रेसला गाजरफ दाखविण्यात आले आहे असा सूर काढला. यावेळेस काँग्रेस स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढेल. त्याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतील, असे सांगण्यात आले. विकासाच्या मुद्द्यावर जनता काँग्रेसला साथ देईल, असे पाटील यांनी विविध विकासकामे सांगत मत मांडले. यावेळी मेडीकल कॉलेजच्या विषयावर त्यांनी राष्ट्रवादीवर शरसंधान केले. तत्कालीन पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हे काम पूर्ण होऊ न शकल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तर पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास कराड स्वतंत्र जिल्हा करणार असल्याचे आनंदराव पाटील ठासून सांगितले.
काँग्रेसने बैठक घेवून सातारा पालिकेची निवडणुक स्वबळावर लढणार अशी पहिल्यांदाच वल्गना केली. या वक्तव्यामागे बोलवता धनी कोण, याची खमंग चर्चा निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. काँग्रेच्या पदाधिकार्यांनी सातारा पालिकेत स्वबळाचा नारा केल्याने खासदारांच्या कार्यकर्त्यांपुढे नवा पेच उभा राहिला आहे. त्यांना एक तर काँग्रेसमधून किंवा खासदारांच्या सातारा विकास आघाडीतून निवडणुक लढावी लागणार आहे. यासाठीच तर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीशी छुपी युती करण्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला नसेल ना? अशी शंकेची पालफ अनेकांच्या मनात चुकचुकली आहे. पण पक्ष आणि नेत्यांपुढे बोलणार कोण असा प्रश्न उपस्थित करून सर्वांनी तेरी भी, चूप आणि मेरी भी चूप अशी भूमिका घेणे पसंत केले आहे.