वडूज : आगामी काळात होणार्या नगरपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी खटाव-माण या दोन तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या विरोधात भाजपा, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर.पी.आय. या सर्व पक्षांनी मिळून तिसरी आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीस येरळा-माणगंगा विकास आघाडी असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनी केली.
वडूज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. येळगांवकर यांनी घोषणा केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, शिवसेनेचे युवराज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय भगत, सुर्यकांत भुजबळ, तानाजी देशमुख, रिपाई तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, अॅड. हणमंतराव जाधव, सागर जगदाळे, अनिरुध्द लावंगरे, मंदार जोशी, अक्षय फडतरे उपस्थित होते.
डॉ. येळगांवकर म्हणाले, गेल्या 10 वर्षात दोन्ही काँग्रेसमधील धनशक्तीवाले व गुंडागर्दी करणार्या लोकांनी खटाव-माण तालुक्यात थैमान घातले आहे. त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकत्यांची मुस्कटदाबी होत आहे. या प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी सर्व पक्षातील चांगल्या कार्यकत्यांना एकत्र करुन आघाडीच्या माध्यमातून लोकांना तिसरा पर्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आघाडीसंदर्भात शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख, कृषी सभापती शिवाजी शिंदे, महेश शिंदे, दिलीप तुपे, वाघोजीकाका पोळ, विलासराव माने, गणेश रसाळ, नंदकुमार गोडसे, राहुल पाटील आदि मान्यवरांशी चर्चा, विचारविनीमय झाला आहे. तसेच वडूज, दहिवडी, म्हसवड येथील निवडणूकीत लोकांनी तिसर्या आघाडीस कौल दिला तर केंद्र व राज्यातील सत्तेचा चांगला फायदा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.