सातारा : झी मराठी वाहिनीवरील संभाजीराजे या मालकेतून राजेशिर्के घराण्यासह अन्य घराण्यांची निंदानालस्ती सुरु होती. या आक्षेपार्ह मुद्यावरुन महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. शिवाय थेट न्यायालयात जाऊ असा इशाराही दिला होता. या भूमिकेला दिवसेंदिवस वाढते समर्थन मिळत होते. या आक्षेपार्ह मुद्यावरुन राजेशिर्के, सुर्वे व अन्य कुळातील महाराष्ट्र भरातील घराणे एकवटली होती. नागपूरपासून कोकण पश्चिम महाराष्ट्र ते बडोद्यापर्यंत परिणामी संतापाचे वातावरण तापत असतानाच अखेर संबंदित मालिकेचे लेकक प्रताप गंगावणे यांनी थेट सातारा येथील अॅन्टीक या माझ्या निवासस्थानी येवून संवाद साधला. जो प्रकार घडला तो अनावधानाने झाला असल्याची कबूली देत दिलगिरीही व्यक्त केली आणि न्यायालयात न जाण्याची विनंतीही गंगावणे यांनी केली. या चर्चेवेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी उपस्थित होते अशी माहिती सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी आज प्रसिध्दी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली.
सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी पत्रकात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अत्यंत जाज्वल्य असा आहे. सर्व जाती समुहांबाबत कमालीचा जिव्हाळा आणि आदरभाव स्वराज्य कार्यप्रणालीत या दोन्ही छत्रपतींचा होता असे असताना झी वाहिनीवरील संभाजीराजे मालिकेच्या माध्यमातून राजेशिर्के, सुर्वे घराण्याबाबत का अवमानकारक दृश्य दाखवली जातात हे कळून येत नव्हते. बर, या घराण्यांचे छत्रपती घराण्याशी मामा भाच्याचे ऋणानुबंध असताना या इतिहासाचा विपर्यास का केला गेला म्हणून या चुकीच्या इतिहासाबाबत आवाज उठवणे गरजेचे होते. खरेतर, हे कर्तव्य जसे इतिहास तज्ञांचे या अभ्यासकांचे जसे आहे तसे ते आपलेही आहे. कारण, आज महाराष्ट्रभर – देशभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक नाटके होत आहेत. चित्रपट निघत आहेत. विपुल असे लिखाण होत आहे. परंतु यातले सत्य या इतिहासाला धरुन किती आहे आणि कल्पनाविलास किती आहे याचा फारसा कोणी विचार करत नाही. नाटकात, चित्रपटात, कादंबरीत एखादे पत्र दाखवले आहे म्हटल्यावर आपणही ते खरे मानू लागतो. त्याकडे चिकित्सक या वस्तुनिष्ठ पध्दतीने पहात नाही. त्यामुळे आजवर इतिहासाचा विपर्यास झालेला दिसतो आहे.
झी वाहिनीवरुन प्रसारीत होत असलेल संभाजीराजे यासारख्या मालिकाची गरज आहे नव्या पिढीला इतिहासाचे आकलन झाले पाहिजे. स्वराज्य निर्माणाच्या लढाईतील च. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शौर्यगाथा तरुणांना समजायला हवी. त्यातून नव्या पिढीला प्रेरणाही मिळायला हवी. परंतु हे करीत असताना, इतिहासाला निंदानालस्तीचा वेगळा रंग देऊन छत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासाला बाधा कोणी पोहोचवू नये ही मालिका दाखविताना लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांनी काळजी घ्यावी आणि नवी पिढी घडावी असा इतिहास दाखवावा.
नव्या पिढीच्या मनात तेढ किंवा कोणत्यातरी घराण्याविषयी द्वेषभावना निर्माण होईल अशी घोडचूक यापुढे करु नये, अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय राहणार नाही. या एकूणच प्रकाराबाबत श्री कुलस्वामिनी शिरकाई देवी मंडळाचे अध्यक्ष रविंद्रनाथ राजेशिर्के, सरचिटणीस सुनिल राजेशिर्के, कार्याध्यक्ष निशांत राजेशिर्के पुणे येथे प्रदीप राजेशिर्के, शिवसिंह राजेशिर्के, बडोदा गुजरात विभागातून चंद्रकांत राजेशिर्के, नागपूर येथून आनंद राजेशिर्के, तसेच कोकणातील कुटरे, संजय राजेशिर्के, संदीप राजेशिर्के, सुधीर राजेशिर्के, विनायक राजेशिर्के, कोंडमळा येथील संतोष राजेशिर्के त्याचबरोबर वेहळेतील चंद्रसेन राजेशिर्के, डेरवणमधील कोंडीबा राजेशिर्के, तळसर येथील दत्ता राजेशिर्के यांच्या भूमिका विचारात घेऊन, पुढील पावले उचलली जाणार आहेत असेही सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी शेवटी स्पष्ट केले.