पाटण: जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह बाळासाहेब पाटणकर (विक्रमबाबा) यांच्या विरूध्दचा अविश्वास ठराव बाजार समितीच्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे पाटणच्या राजकिय गोटात खळबळ उडाली असून या अविश्वास ठरावामुळे पाटण तालुक्याच्या पुढील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. या अविश्वास ठरावामुळे विक्रमबाबा यांचा वेगळा मार्ग सुकर झाला असून भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे वर्चस्व आहे. या बाजार समितीचे सभापती म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची वर्णी लागली होती. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामकाज करत असल्याने संचालक सदस्यांनी
विक्रमबाबा पाटणकर यांचे विरूध्द अविश्वास ठराव घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याकरिता बाजार समितीच्या 14 संचालकांनी जिल्हा उपनिबंधक संस्थेकडे मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सभापती विक्रमबाबा पाटणकर, उपसभापती दादासो यादव, संचालक अरविंद जाधव, अधिक माने, सुहास माने, राजाराम मोरे, सुभाष पाटील, सौ. रेखा पाटील, शहाबाई यादव, शंकर संकपाळ, श्रीरंग मोहीते, अभिजीत जाधव, उत्तम जाधव, आनंदा डुबल, सिताराम मोरे, रामदास कदम, शरद राऊत व आनंदराव पवार यांची उपस्थिती होती. यावेळी संचालकांनी मागणी केलेला अविश्वास ठराव या एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संजय पवार यांनी काम पाहीले.
दुपारी 12.30 वा. सुमारास कृर्षि उत्पन्न बाजार समितीच्या मल्हारपेठ ता. पाटण येथील मुख्य कार्यालयात विशेष सभेस सुरवात झाली. संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व सभापतीसह 19 सदस्य हजर होते. विक्रमबाबा पाटणकर यांच्यावर अविश्वास ठरावाचा विषय आल्यानंतर विक्रमबाबा यांनी सभेतुन उठून कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. व त्यांनी बाजार समिती परिसर सोडले. नुकत्याच सहा महिन्यापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विक्रमबाबा पाटणकर यांना चाफळ जिल्हा परिषद गटा कडून राष्ट्रवादी पाटणकर गटाने उमेदवारी नाकारली होती. तेंव्हा पासुन विक्रमबाबा यांचा भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. कृर्षि उत्पन्न बाजार समितेच्या सर्व संचालंकाशी मैत्रीत्वाचे संबंध आहेत. या मैत्रीत रोजचा सहवास असलेले संचालक यांच्याशी विश्वासानेच कृर्षि उत्पन्न बाजार समितीचा कारभार पाहिला जात होता. मग अचानक राजकीय व्देषासाठी बाजार समितीच्या कारभारात विश्वासात न घेता विक्रमबाबा कारभार करतात असा अरोप करून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. यानंतर विक्रमबाबा पाटणकर कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.